नामदेव मोरे, नवी मुंबईअच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये तूरडाळ १२० ते १७० रुपये किलो दराने तर तूर व मूगडाळ १२० रुपये किलो दराने विकली जात आहे. कांद्यापाठोपाठ आता डाळीही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहावेत यासाठी राज्यातील काँगे्रस व राष्ट्रवादी सरकारने दोन वर्षांपूर्वी डाळींना बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही दिवस डाळींचे भाव नियंत्रणात राहिले होते. त्यानंतर मात्र डाळीचे भाव वाढतच गेले आहेत. सद्य:स्थितीत मुंबई बाजार समितीमध्ये तूरडाळ १०५ ते १५० रुपये किलो दराने विकली जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १२० ते १७० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आतापर्यंत सर्वांत स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या मसूरडाळीचे होलसेलचे दर ७८ ते ८५पर्यंत गेले आहेत. किरकोळ मूगडाळीचे दर ८२ ते १०० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १२० रुपयांवर गेले आहेत. श्रावण महिना सणासुदीचा असतो. पक्वान्नासाठी चणाडाळीची मागणी वाढलेली असते. गतवर्षी ३४ ते ६० रुपये किलो दराने विकली जाणारी चणाडाळ आता ५० ते ७० रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तूरडाळ मोठ्या प्रमाणात लातूर, जालना व इतर ठिकाणांवरून विक्रीसाठी येत असते. परंतु गतवर्षी पीक कमी झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.
डाळीला महागाईची फोडणी
By admin | Updated: August 21, 2015 01:08 IST