वसंत भोईर,
वाडा- तालुक्यातील पेठरांजणी या गावात कुपोषणाने दगावलेली रोशनी सवर हिचे कुटुंब रेशनकार्डासापसून २० वर्षे वंचित असल्याची बातमी मंगळवारी दैनिक लोकमतच्या हॅलो पालघर-वसई मध्ये प्रसिध्द होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून आणि त्यांनी चोविस तासांत तत्परता दाखवून रोशनीचे वडील गुरूनाथ सवर यांना रेशनकार्ड घरपोच केले त्यामुळे सवर यांनी लोकमतला धन्यवाद दिले.सवर यांचे कुटुंबीय अत्यंत हालाखीचे जीवन जगत असून रेशनिंग कार्डच नसल्याने त्यांना धान्य मिळत नव्हते शिवाय रोजगार उपलब्ध नसल्याने केव्हा केव्हा उपवास मारीची वेळ येते त्यामूळे धान्य मिळण्यासाठी रेशनकार्डची नितांत गरज होती. त्यामूळे रेशनकार्ड मिळावे म्हणून अनेकवेळा तहसिल कार्यालयाकडे लेलपाटे मारत होतो. परंतु प्रशासन दाद देत नव्हते परंतु मंगळवारी लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच मला रेशनकार्ड मिळाले असल्याचे सवर यांनी सांगितले.गेल्या २० वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने निदान धान्य तरी उपलब्ध होईल. त्यामूळे स्थलांतर वाचून या कुटुंबातील मुलांचे शिक्षण तरी सुरू होईल व परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.