ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. सरकार आणि पोलीस जर त्यांचे रक्षण करण्यास कमी पडत असल्यास त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तसेच दलितांवरील अत्याचारासंबंधी वादग्रस्त वक्तव्ये करणारे व्ही.के. सिंग यांच्यावरही आठवले यांनी टीका केली असून सिंह यांच्यासारख्या नेत्याने अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत असे आठवले म्हणाले.
गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे देशातील असहिष्णुता वाढत असल्याची टीका सर्व स्तरातून होत असतानाच मंगळवारी हरियाणात दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली. केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी या घटनेवर बोलताना कोणी कुत्र्याला दगड मारला तरी केंद्र सरकारलाच जबाबादार धरणार का असे वक्तव्य केले. एवढ्या संवदेनशील विषयाबाबत सिंह यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे गदारोळ माजला आहे. सर्व स्तरांतून सिंह यांच्यावर टीका होत असून त्यांना मंत्रीमंडळातून हाकलण्यात यावे अशी मागणी होत आहे.