मुंबई : आम्ही निर्दोष आहोत, हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत तुरुंगवास आणि आमचे आयुष्य संपावे, नव्हे संपूर्ण भुजबळ कुटुंब संपावे असे प्रयत्न सर्व पातळ्यांवर आमचे विरोधक करीत आहेत. ५० वर्षांची आमची राजकीय आणि सामाजिक कारकिर्द आज पणाला लागलेली आहे. या वयात आम्ही किती आणि कसे लढावे हा प्रश्न आहे. बाहेर वाटेल ते आरोप करणे, बातम्या देणे सुरू आहे. त्याला तुरुंगातून उत्तर देऊ; पण आणखी किती खोट्या केसेस टाकणार आहात, असा उद्विग्न सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.राज्य शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फिर्याद दाखल केल्याचे वृत्त आले आहे. आम्ही नियमितपणे आयकर विभागाला आमच्या उत्पन्नाची विवरणपत्रे सादर केलेली आहेत. तज्ज्ञांकडून पूर्ण अभ्यासाअंती याबाबत आम्ही माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, आमची मालमत्ता पूर्णत: नियमात बसणारी आहे. त्याबाबतचा सर्व व सखोल तपशील लाचलुचपत विभागाला चौकशीच्या वेळी सादर केला आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात, अतिरिक्त चटई निर्देशांक (एफएसआय) वापरण्याची परवानगी देऊन मिळणाऱ्या १०० कोटी रुपयांतून महाराष्ट्र सदन, हायमाउंट गेस्ट हाउस, आरटीओची इमारत, प्रकल्पग्रस्तांसाठी कायमस्वरूपी निवारा इत्यादी बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीचा आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे म्हणणे असे आहे की, या प्रकल्पातून आम्हाला ८०० कोटी रुपये भ्रष्टाचारात मिळाले. परंतु वास्तव हे आहे की, चमणकरांना शासनाकडून एक इंच जमीन, एफएसआय किंवा एक रुपयाही मिळालेला नाही. असे असतानाही आम्हाला मात्र ८०० कोटी रुपयांची लाच मिळाल्याचे गृहीत धरून आमच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली. केसेस केल्या आणि मालमत्ताही जप्त करायची सुरुवात केली आहे, असेही भुजबळ यांनी हाती लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
एसीबीने उपस्थित केलेल्या सर्व शंकांना आणि प्रश्नांना उत्तरेही दिलेली आहेत. परंतु नियमानुसार आमच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये ज्या गोष्टी धरावयास नको, अशा काल्पनिक गोष्टी गृहीत धरून केसेस केल्या जात आहेत, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.