मुंबई : नानौक हे चक्रीवादळ ओमानकडे सरकले असून, त्याची तीव्रता कमी झाली असली तरी दुसरीकडे मान्सून वेगाने आगेकूच करत असल्याने पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. पुढील चारही दिवस भरतीचे आहेत, त्यामुळे मुंबईकरांनी पुढील चार दिवस समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा शनिवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने अंतर्गत दक्षिण कर्नाटकचा भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि मध्य-पश्चिम व वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि अंतर्गत कर्नाटकाच्या आणखी काही भागात पुढील २४ तासांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. शिवाय नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर आणि हिमालयालगतचा पश्चिम बंगाल, सिक्कीमचा उर्वरित भाग, गंगेलगतचा पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात पुढील तीन दिवसांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.दरम्यान, कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Updated: June 15, 2014 02:13 IST