डहाणू : तालुक्याला रविवार पासूनच्या परतीच्या संततधारेमुळे चिंचणी, तारापुर, डहाणू खाडी, गंजाड वाणगाव या भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून डहाणू शहरात तब्बल ४५६, चिंचणी ४६०, मल्याण येथे ४५० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. डहाणु बाजार पेठेत पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे पहाटे ५ च्या सुमारास डहाणू खाडी, चिंचणी, तारापूर येथील घरात ५ फुट पाणी शिरले आहे. चिंचणी, घाचीयापाडा ,पोशेरा तलाव नागेश्वारीपाडा ,भाटीपाडा तसेच सागरी महामार्गाच्या बाजूचे पाडे चिंचणी शाळा नंबर १ येथे हलवण्यात आले. दुपारी १ च्या सुमारास भरती सुरु होणार असल्याने समुद्र किनारपट्टीच्या गावांना पुराची भीती निर्माण झाली होती. त्याकारणाने रहीवाशांनी विजेची उपकरणे, तसेच साहित्य हलवण्यासाठी धावपळ केली. वाणगाव देदाळे,वाणगाव नाका येथे पाणि भरल्याने चिंचणी गावाला पुरावा वेढा पडलेला होता. तर वाणगाव पूर्वेस पाणी साचून गुडघाभर पाण्यातून रहीवाशांना घराबाहेर पडावे लागले.गंजाड महालपाडा येथील रस्ता पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, गेल्या रविवार पासून पडणाऱ्या धो-धो पावसामूळे चिंचणी, तारापूर, धाकटी डहाणू, घाचिया, आगर, चिंचणी भाटीपाडा, सागरी महामार्ग येथील रिफाई नगर, रिफाई मोहल्ला येथील शेकडो घरांना पावसाच्या पाण्याचा तडाखा बसला असून त्यांचे संसार उघड्यावर पडला आहे. चिंचणी खाडीनाका येथे पहाटे पाच वाजताच्या सूमारास चिंचणी-तारापूर मुख्य रस्त्यावर पाणी भरले होते. त्यावेळी येथील तरूणांनी रस्त्याच्या कडेला दोन बांधून शेकडो रहदाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षात प्रथमच एवढा पाऊस झाल्याने आज पहाटेपासून सर्वत्र हाहाकार उडून घर-दार सोडून नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झाले होते. (वार्ताहर)
परतीच्या मुसळधार पावसामुळे डहाणूत हाहाकार
By admin | Updated: September 22, 2016 03:18 IST