कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने २ सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल, असे जाहीर केले. न्यायाधीश रणजित मोरे व अचादिया यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. पानसरे यांच्या हत्येस सहा महिने पूर्ण झाले तरी त्यांचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाचा तपास ठप्प आहे. पोलिसांनी मागच्या दोन महिन्यांपूर्वी संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली परंतु तरी त्यातूनही काही हाती लागलेले नाही. दरम्यान, हा तपास उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सीआयडीच्या विशेष पथकाने करावा, अशी मागणी करणारी याचिका पानसरे यांची सून मेघा व मुलगी स्मिता पानसरे यांनी यापूर्वीच न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका दाखल केल्यावर राज्य सरकारने घाईघाईत या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून त्याची सुनावणी १७ आॅक्टोबरला ठेवली होती परंतु हे पथक नेमूनही तपासात काहीच प्रगती नसल्याने पूर्वीच्याच याचिकेची सुनावणी लवकर घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार ही सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयात सुनावणी होणार असल्याने राज्य सरकारला तिथे तपासाबाबत काही ना काही उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे या तपासाची नेमकी स्थिती आता न्यायालयातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभय नेवगी यांनी बाजू मांडली. -------------------
पानसरे हत्येप्रकरणी २ सप्टेंबरला सुनावणी
By admin | Updated: August 20, 2015 23:26 IST