ठाणे : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या येऊरला आता इको टुरिझम दर्जा मिळणार आहे. महापालिका आणि वन विभाग यांच्यात झालेल्या चर्चेअंती यावर एकमत झाले आहे. या पर्यटन उभारणीचा सर्व खर्च पालिका आपल्या खांद्यावर घेणार असून त्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेने वन विभागाकडून मागवला आहे. शिवाय, येऊर पर्यटन केंद्र आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्राच्या आराखड्यास वन विभागाने तत्त्वता मान्यता दिल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्याचबरोबर येऊरमधील तलावाचे महापालिका सुशोभीकरण करणार असून तिथे पर्यटकांना जाता यावे म्हणून वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. येऊरमधील पर्यावरणस्नेही पर्यटन केंद्र उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवून आयुक्त जयस्वाल यांनी त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव वनविभागाला सादर करण्यास सांगितले आहे. सुप्रसिद्ध कलावंत आणि जगभरातील अक्षरधाम मंदिराचे मुख्य आरेखक अरुणकुमार यांनी येऊरमध्ये पयर्टन सेंटर आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्र उभारण्यासंबंधीचा आराखडा तयार केला आहे. येऊरमधील सुमारे दीड एकर जागेमध्ये पयर्टन केंद्र आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. कोणतीही वृक्षतोड न करता तसेच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी या प्रकल्पात घेतली जाणार आहे. या पालिका येऊरमध्ये तलावाचे सुशोभीकरण करणार असून पर्यटकांना तेथे जाता यावे म्हणून वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. मात्र, वनविभागाच्या परवानगीशिवाय ही सेवा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे वनविभागाने त्यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेला सादर केल्यास पर्यटनाचा हा मार्गदेखील खुला होणार आहे. (प्रतिनिधी)रस्त्यांचे प्रस्तावही वन विभागाकडेघोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत सेवा रस्ते तयार करण्याचे काम महापालिकेने काही महिन्यांपूर्वी हाती घेतले आहे. मात्र, वन विभागाच्या जागेमुळे चार ठिकाणी कामात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या वाइल्ड लाइफ बोर्डाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच पातलीपाडा येथील उद्यान आणि टिकूजिनीवाडी भागातील रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचाही प्रस्ताव वन विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. टिकुजिनीवाडीच्या रस्ता दुरुस्तीला वन विभागाने मान्यता दिल्याने त्याचे काम मार्गी लागले आहे. टिकुजिनीवाडी येथील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामासाठी परिसरातील बेकायदा बांधकामे हटवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. श्रीनगर ते गायमुख हा रस्ता वन विभागाच्या जागेतून जाणार असून त्याचे सर्वेक्षण सुरू असल्यामुळे नेमकी किती जागा लागेल, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सर्वेक्षण पूर्ण होताच त्याचा प्रस्ताव सादर होईल.
येऊरच्या इको टुरिझमला हिरवा कंदील
By admin | Updated: May 21, 2016 03:28 IST