मुंबई : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे अपुरे असून येथे पायाभूत सुविधा आणि नवीन रेल्वे मार्गाचे प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. राज्यात नवीन रेल्वे सुरु करणे, प्रवाशांच्या सोयी-सुविधांच्या सुधारणेसाठी राज्यातील खासदार, आमदार यांनी आवाज उठविला असून या अपेक्षांची पूर्तता होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. पुढील वर्षी होणाऱ्या अर्ध-महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, देवळाली आणि ओढा स्थानकांवरील सुविधा वाढविण्याची गरज आहे. राज्य शासनानेही यासाठी आर्थिक तरतूद केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.मुंबईतील रेल्वे सेवा सुधारावी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये देखील अजून वाढ होणे आवश्यक आहे. रेल्वे फलाटांची उंची वाढविण्याची आवश्यकता असून मध्य रेल्वेवरील हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली, विरार, डहाणूसाठी अधिकाधिक लोकल सेवा सुरू करण्याची गरज आहे. एमयुटीपी- २ या प्रकल्पासाठी ५०० कोटी, पनवेल-कर्जत कॉरिडॉर आणि ऐरोली-कळवा या एमयूटीपी- ३ टप्प्यातील रेल्वेमार्गांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्या आठ मार्गांसाठी तातडीने निधी द्यामहाराष्ट्रातील ८ रेल्वे प्रकल्पांमध्ये ५० टक्के हिस्सा देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यापैकी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ व वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन दोन रेल्वे मार्गांचे काम पुरेशा निधीअभावी रेंगाळले आहे. तर, वडसा-गडचिरोली, आदिलाबाद-माणिकगड, कराड-चिपळूण, मनमाड-इंदूर, पुणे-नाशिक आणि नागपूर-नागभिड या ६ प्रकल्पांना अद्याप मान्यता मिळाली नाही. राज्य शासन पुढील तीन वर्षांत आपला हिस्सा देण्यास कटिबद्ध असून रेल्वे मंत्रालयानेही निधी द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला न्याय द्या
By admin | Updated: July 5, 2014 04:47 IST