ठाणे : उल्हास नदीत सहावर्षीय चिमुरडीला फेकणारा तिचा सावत्र पिता अद्यापही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार केले असून ते राजस्थानला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, एकता सैनी हिच्या पोटाला दुखापत झाली असून तिच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील वर्तकनगर येथे राहणारी निर्मला सैनी या महिलेने सात वर्षांपूूर्वी तुळशीराम सैनी याच्याबरोबर दुसरे लग्न केले. तत्पूर्वी निर्मलाला पहिल्या पतीपासून एकता नावाची मुलगी आहे. काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये घरगुती वाद होत होते. याचाच राग तुळशीराम नेहमी एकतावर काढत असे. त्यामुळे निर्मलाने तिला गावी शिक्षणासाठी पाठवले, पण शाळेची सुटी लागल्याने ती ठाण्यात आपल्या आईकडे आली होती. गुरुवारी रात्री तिला दप्तर, पुस्तक व चप्पल घेऊन देतो म्हणून तुळशीराम मुलीला घेऊन निघाला. त्याने मित्रासोबत थेट बदलापूर गाठले. तेथील उल्हास नदीच्या पुलावर नेऊन तिला मारहाण करून नदीत फेकले. सुदैवाने ती जलपर्णीत अडकल्याने बचावली. याचदरम्यान मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. बचावलेल्या चिमुरडीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ती सुखरूप आहे. तसेच तिच्या पोटाला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ एक पथक तयार करून त्याच्या मागावर ते राजस्थानला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
चिमुरडीस नदीत फेकणारा पिता अद्यापही फरारच
By admin | Updated: July 2, 2016 04:30 IST