ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १७ - विविध मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना आता सहकारमंत्र्यांच्या कंपनीमुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल अॅग्रो ग्रुप'वर नियमबाहय गुंतवणूक जमवल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. सेबीने त्यांच्या कंपनीवर शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. सेबीच्या या निर्णयामुळे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला आहे.
लोकमंगल ग्रुपने जमा केलेली ७४.८२ कोटी नियमबाह्य असून, ही सर्व गुंतवणूक सव्याज परत करावी असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे. सहारा ग्रुपलाही सेबीने गुंतवणूकदारांचे पैसे अशाच प्रकारे परत करण्याचे आदेश दिले होते. लोकमंगल समूहाच्या संचालक मंडळावर सुभाष देशमुख यांचे कुटुंबिय असून, सर्व संचालकांना डीमॅट खात्याचे विविरणपत्र सादर करण्याचे आदेश आहेत.