जिल्हा परिषद : सीएससी सेंटरच्या माध्यमातून गावात २७ सुविधानागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँक व अन्य सुविधा उपलब्ध झाली आहे.बँकांच्या शाखा नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. परंतु आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून वित्तीय समावेशन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात शून्य रकमेवर विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे खाते उघडणे शक्य झाले आहे. आर्थिक व्यवहारासोबतच मनरेगावरील मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा केली जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-पंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. ग्रामस्तरावर २७ प्रकारचे दाखले व अर्जाचे नमुने उपलब्ध होत आहे. सीएससी केंद्र जिल्हा परिषदेतील संग्रामसोबत जोडण्यात आले आहे. केंद्रात शासनाच्या विविध योजनांसोबतच गावातील नागरिकांची माहिती संग्रहित क ेली आहे. सीएससी केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन शॉपिंग, रेल्वे आरक्षण, मोबाईल रिचार्ज, मोबाईल पेमेंट, विविध स्वरूपाचा विमा, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन योजनेचा लाभ, आॅनलाईन प्रशिक्षण, आधार कार्ड अशा स्वरूपांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे. केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना लवकरच ई-न्यायालय, बाजारभावाची माहिती, परीक्षांचे निकाल, हवामान, पेन्शन योजना,विमा योजनांची माहिती उपलब्ध के ली जाणार आहे.ग्रामीण भागातील लोकांनी ई-पंचायत अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
ई-पंचायतमुळे ग्रामीण भागात बँक सुविधा!
By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST