नाशिक : स्मार्टसिटीकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या नाशिक महापालिकेला उदासीन भूमिकेचा फटका बसला आहे. एका उद्योजकाने शहरात वायफायसाठी मोफत बँडविथ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असताना केवळ प्रशासनाने हॉर्डवेअर खरेदीसाठी टाळाटाळ केल्याने हा विषय बाजूला पडला. त्यामुळे याच उद्योजकाने नवी मुंबईत अशाच प्रकारे मोफत सेवा देण्याचा दिलेला प्रस्ताव तेथील महापालिकेने मान्य केला आहे.काही दिवसांत हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायफायच्या माध्यमातून हायफाय होण्याचा नाशिकचा प्रयत्न तूर्तास तरी बाजूला पडला आहे. नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने ही सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केला होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात बँडविथ असल्याने ती शहरासाठी मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी केली होती. महापालिकेच्या वतीने सुरुवातीला कॉलेजरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड तसेच सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ही सेवा मोफत देण्यात येणार होती. तसेच त्यासाठी महापालिकेने हार्डवेअरचा खर्च करणे आवश्यक होते. पालिकेला त्यावेळी जेमतेम २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च करावा लागणार होता; परंतु तेवढी तसदीही महापालिकेने घेतली नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये वायफाय सेवेची घोषणा केली होती. नवी मुंबई महापालिकेने ईएसडीएसची सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तो निधी खर्च करण्याची तयारी दर्शविल्याने लवकरच हा विषय मार्गी लागणार असल्याचे इएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाशिकच्या उदासीनतेमुळे नवी मुंबईत वायफाय मोफत
By admin | Updated: November 29, 2015 00:57 IST