ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २१- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसने महाराष्ट्रात अपेक्षीत उपाययोजना केलेल्या नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे. सध्या फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'ना'राजी नाम्याची कारणे दिले. काँग्रेसने सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. पण नऊ वर्ष वाट बघूनही मला मुख्यमंत्रीपद दिले नाही. माझ्यासोबत आलेल्यांना पक्षाने न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
लोकसभेतील पराभवानंतर राज्यात काँग्रेसने काही पावले उचलायला हवी होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपाययोजना राबवणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तसे झालेले नाही असे राणेंनी सांगितले. जनतेसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले जात नाही, निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत दोष असून त्यांचा प्रशासनावर वचक नाही अशा आरोपांच्या फैरीच त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दिशेने झाडल्या. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय नाही. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीतील या पराभवाच्या सामूहिक जबाबदारीतील घटक होण्याची इच्छा नसल्याने मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले.
आज संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी माझा राजीनामा स्वीकारल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करीन असे राणेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याविषयी सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे राणेंना सांगितले आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी विचारले असता राणे म्हणाले, मी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा अथवा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला नाही.