बदल्यांचा खेळ : दीड महिन्यांपासून नियुक्ती हवेतजीवन रामावत - नागपूरकृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचाव्या, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख पटावी, उत्पादनात वाढ व्हावी व देशातील बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, या उदात्त हेतूने गत चार वर्षांपूर्वी कृषी विभागाचे विभाजन करून, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. परंतु सध्या नागपुरातील हा विभाग शेतकऱ्यांना समृद्ध करण्याऐवजी स्वत:च अनिश्चितेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. या विभागाच्या प्रमुख तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. नलिनी भोयर यांची गत दीड महिन्यापूर्वी अचानक रोजगार हमी योजना विभागात बदली करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. शिवाय त्यांच्या जागी कुणाची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे गत दीड महिन्यापासून हा विभाग अक्षरश: वाऱ्यावर आहे. गत १५ जुलै रोजी डॉ. भोयर यांचा बदली आदेश जारी झाला. मात्र असे असताना, त्यांनी अजूनपर्यंत येथील खुर्ची सोडलेली नाही. शिवाय शासनाला त्यांना कार्यमुक्त करण्याची गरजही वाटली नाही. मग, त्यांच्या बदलीचा हा सर्व खेळ कशासाठी, असा सध्या सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे या सर्व घडामोडींचा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होऊ लागला आहे. माहिती सूत्रानुसार डॉ. भोयर यांची ही बदली त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बदली आदेश जारी होताच, त्यांनी तो रद्द करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. शेवटी एका ठिकाणी त्यांना बदली आदेश रद्द करण्याचे आश्वासन मिळाले. कदाचित त्यामुळेच अजूनपर्यंत त्या येथून कार्यमुक्त झाल्या नसल्याची चर्चा आहे. अलीकडे ‘आत्मा’ या विभागाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याशी निगडित महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.
कृषी विभागाचा ‘आत्मा’ आॅक्सिजनवर!
By admin | Updated: September 2, 2014 01:05 IST