ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १० - दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानचा साठवण तलाव कोरडा पडल्याने गेले काही दिवस संस्थान टँकरने पाणी घेत आहे. मात्र त्यात गोड्या पाण्याचे उदभव कमी झाल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले.
संस्थान सध्या रोज टँकरने तेरा ते सतरा लाख लिटर पाणी विकत घेत आहे. मात्र यात गोडे कमी व खारे पाणी अधिक आहे. या खाऱ्या पाण्याचा टीडीएस 1400 पर्यंत असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. संस्थान प्रति लिटर अकरा ते तेरा पैसे प्रमाणे हे पाणी खरेदी करत आहे. चांगल्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी असूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने भाविकांचे आरोग्य व संस्थान प्रति असलेला विश्वास जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सध्या संस्थानच्या अडीच हजारावर रुम आहेत, पहिल्या टप्यात पन्नास टक्के रुम बंद ठेवण्यात येणार आहे. ऑनलाइन वगळता फारच थोड्या भाविकांना रुम मिळणार असल्याने भाविकांना खासगी लॉज मध्ये उतरावे लागणार आहे.
संस्थानला पाणी पुरवठा करणारे दारणा धरण कोरडे पडल्याने 5 जून ला येणारे आवर्तन रद्द झाल्याने तसेच संस्थानच्या तीन तलावात प्लास्टिक कागद अंथरणे सुरु असल्याने ही परिस्थिती उद्भवली. एक तलावात अगदी थोडे पाणी असून ते भोजनगृहा साठी वापरण्यात येत आहे.
नगरपंचायत तळेही शेवटच्या टप्प्यात असून शहराला दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.