मुंबई : मावळमध्ये २०११ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी तपास यंत्रणांनी आरोपी असलेल्या पोलिसांवरील केस बंद करण्यासाठी वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांपुढे क्लोझर रिपोर्ट दाखल केला आहे, तर इंडिका कारमधून गोळीबार केल्याप्रकणी पोलिसांनी आरोपी हाताला लागत नसल्याने ‘ए’ समरी रिपोर्ट दाखल केला आहे. या दोन्ही अहवालांवर दंडाधिकाऱ्यांनी निर्णय न घेतल्याने गुरुवारी उच्च न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना या अहवालांवर आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले.पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी सोडण्याच्या शसनाच्या निर्णयाला मावळ येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी महामार्गावर आंदोलन केले असता, तेथे असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) संदीप कर्णिक यांनी केलेल्या गोळीबारात वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी सर्व आरोपी पोलिसांविरुद्ध पुरावे नसल्याने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांपुढे क्लोझर रिपोर्ट दाखल केला आहे.परंतु राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या आयोगाने संदीप कर्णिक यांना गोळीबारासाठी जबाबदार धरले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका आय. जी. खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांपुढे ‘सी’ समरी रिपोर्टबरोबरच शेतकऱ्यांच्या जमावावर इंडिका कारमधून गोळीबार करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध ‘ए’ समरी रिपोर्ट (अज्ञात व्यक्ती फरारी असल्याने पुढील कारवाई होऊ शकत नाही) दाखल केला आहे. मात्र, या दोन्ही अहवालांवर दंडाधिकाऱ्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही, अशी माहिती खंडेलवाल यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)दंडाधिकाऱ्याच्या निर्णयानंतर सुनावणीदंडाधिकाऱ्यांनी या अहवालांवर निर्णय घेतल्याशिवाय आम्ही या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने वडगाव-मावळ दंडाधिकाऱ्यांना आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ आॅक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.
गोळीबार प्रकरणी निर्णय घ्या!
By admin | Updated: July 29, 2016 02:04 IST