दासगाव : यंदा पावसाने कोकणात जोरदार हजेरी लावली असून महाड तालुक्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडला. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील दासगावमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आजही कायम आहे. अनेक विहिरींचे पाणी दूषित असून ग्रामस्थांच्या खिशाला चाट लावून टँकर मागवावे लागत आहे. सध्या नळ पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असूनही नसल्यासारखी आहे. कधी वीज समस्या तरी कधी पाण्याची अडचण, कधी लाइन लिकेज अशा अनेक समस्या उद्भवत असून या योजनेचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने दासगावकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.दासगाव गावाची लोकसंख्या साडेपाच हजारांच्या आसपास आहे. यंदा पाऊसही चांगला झाल्याने येत्या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पाणीटंचाई देखील भासणार नाही. मात्र महाड तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या दासगावसारख्या गावात आजही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. २० वर्षांपूर्वी दासगाव व वहूर या गावासाठी रायगड किल्ल्याशेजारी असलेल्या ओतुर्डे धरणातून नळपाणी पुरवठा योजना राबविली गेली. या धरणाच्या पाण्यावरून महाड शहर कोतुर्डे ते महाड शहरापर्यंत असणारी सर्व गावे तसेच महामार्गालगत गांधारपाले, साहीलनगर, केंबुर्ली, वहूर, दासगाव ही गावे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ऐन एप्रिल व मे महिन्यात या धरणाचे पाणी आटून गांधारपाले, साहीलनगर, केंबुर्ली, वहूर दासगाव या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याशिवाय पर्याय राहत नाही. या दोन महिन्यात या गावांना दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसते. यंदा मात्र या नळ पाणीपुरवठा योजनेची झळ दासगावकरांना बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे लाखो रुपये थकीत वीज बिल यामुळे महावितरण या योजनेचे जॅकवेलचे वीज बिल कनेक्शन कधीही बंद पडते. यामुळे अनेकवेळा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. नदीचे गढूळ पाणी असल्याने पावसाळ्यामध्ये कोणीही या योजनेचा वापर करत नाही. तर जुनी झालेली पाइपलाइन वेळोवेळी फुटत असून पाणीपुरवठा खंडित होतो. पाइपलाइनचे काम जरी दासगाव ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले तरी पाइपलाइन जुनी असल्याने त्यांचाही नाइलाज होतो. यंदा पावसाळा संपल्यापासून कमीत कमी दहा ते पंधरा वेळा या लाइनवर अनेक समस्या निर्माण झाल्या. यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होता. दासगावमध्ये भोईवाडा व बामणेकोंड यामध्ये दहा ते बारा विहिरींचा समावेश आहे. यामधून मुख्य विहिरी मोहल्ला व बंदर व ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेली नाक्यातील विहीर या मुख्य विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. सध्या या विहिरींचा वापर भांडी व कपडे धुण्याकरिता होत आहे. पिण्यासाठी वापरत नसल्याने जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या काळामध्ये दासगाव ग्रामस्थ डोंगरातून येणारे झरे यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करत होते. सध्या तेही बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. सध्या दासगाव भोईवाडा नाका मोहल्ला, पाटील आळी, बुद्धवाडी या सत्तर टक्के गावाला नळ पाणीपुरवठ्याच्या खेळखंडोब्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. (वार्ताहर)>दासगाव धरणाचे काम प्रलंबितगेली २० वर्षांपूर्वी दासगावमध्ये वांद्रेकोंड येथे एका धरणाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. याचे इस्टीमेट देखील तयार केले होते. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने तसेच शासनाने लक्ष न दिल्याने या धरणाची फाईल जलसंपदा विभागाकडेच मंत्रालयामध्ये पडून आहे. महाड औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळे खाडीलगत असलेल्या गावांच्या पाण्याच्या विहिरी अनेक वर्षांपासून दूषित झाल्या आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या धरणाचे पाणी मिळण्यासाठी वहूर तसेच दासगाव या दोन्ही गावांतून ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव पाठवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी सर्व्हे झाला. मान्यता मिळाली, मात्र निधीअभावी अंतिम मान्यतेसाठी पडून आहे. जर या ठिकाणी या दोन्ही गावांना पाणी मिळाले तर या दोन्ही गावांची समस्या दूर होणार आहे. >दासगाव नळपाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन जुनी असल्याने निकामी झाली आहे. पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होत आहे. समस्या दूर करण्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीमध्ये धरणातून पाणी मिळण्याकरिता ग्रा. पं. मार्फत प्रस्ताव दिला होता. मात्र औद्योगिक वसाहतीपासून दासगाव नळपाणी पुरवठा योजनेचे जॅकवेलपर्यंतचे अंतर जास्त आहे. नांगलवाडी या ठिकाणी कमी दाबाने पाणी पोहोचत आहे. या लाइनकरिता निधीही कमी आहे. यामुळे प्रस्ताव पडून आहे. जलशिवार योजनेंतर्गत पाणी समस्या दूर करण्यासाठी गावखाडी नाल्यावर पक्के बंधारे बांधण्याकरिता तहसीलदार, प्रांत कार्यालय, कृषी कार्यालय यांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे.- प्रज्ञा खैरे, सरपंच, दासगाव
दासगावमध्ये पाणीटंचाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:44 IST