मुंबई : रेल्वेला लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रत्नागिरीतील दाभोळ वीज प्रकल्पाचा आधार घेतला आहे. या प्रकल्पातून रेल्वेला पुढील आठवड्यापासून वीजपुरवठ्याला सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पवन ऊर्जा - रेल्वे सेक्टरमध्ये संधी’ या विषयावर वाय.बी. चव्हाण सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रभू यांनी रेल भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिसंवादात सहभाग घेतला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या परिसंवादात रेल्वे बोर्डाचे सदस्य (इलेक्ट्रीकल) नवीन टंडन, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. रेल्वे बोर्डाचे सदस्य (इलेक्ट्रीकल) नवीन टंडन यांनी पुढील पाच वर्षांत एक हजार मेगावॅट वीज सौरऊर्जा व पवनऊर्जेतून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. मुंबईतील रेल्वे स्थानकांनाही असणारी विजेची गरज पाहता सोलार पॅनलचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या छतावर आणि इमारतींवर सोलार पॅनल बसविण्यात येईल. यातून वीज निर्माण केली जाणार असल्याची माहिती टंडन यांनी या वेळी दिली. चर्चगेट स्थानकाच्या छपरावर लवकरच येत्या काळात सोलार पॅनल बसविण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रभू म्हणाले...रेल्वेची विजेची गरज भविष्यात वाढू शकते. त्यामुळे सौरऊर्जा व पवनऊर्जेतून जास्तीतजास्त वीज निर्मिती करणे आवश्यक असून, तसे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या खासगी वीज कंपन्यांकडून ज्या दराने वीज मिळते त्यापेक्षा अर्ध्या दराने दाभोळ प्रकल्पातून वीज मिळेल आणि पुढील आठवड्यापासून त्याचा पुरवठा सुरू होईल.
दाभोळ प्रकल्पातून रेल्वेला मिळणार वीज
By admin | Updated: November 21, 2015 02:43 IST