योगेश गुंड, अहमदनगरस्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवत एका रस्त्यासाठी डोंगर फोडण्यात आयुष्य खर्ची घालणाऱ्या बिहारमधील ‘माउंटन मॅन’ अर्थात दशरथ मांझी यांची देशभरात चर्चा होत असताना महाराष्ट्रातही एका रस्त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राजाराम भापकर गुरुजींनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. आज सारा महाराष्ट्र त्यांना ‘रस्तेवाले गुरुजी’ म्हणून ओळखतो.ज्या रस्त्याच्या कामासाठी गुरुजींनी ४० वर्षे खस्ता खाल्ल्या त्याच रस्त्याच्या कामावर त्यांनी आपलं निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम खर्च करून ‘मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा महत्त्वाच्या असतात’ हे दाखवून दिलं. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी हे तत्त्व जीवापाड जपलं आहे. गुरुजींचं गाव गुंडेगाव (ता. नगर, जि. अहमदनगर). गुंडेगावला नगरपेक्षा श्रीगोंद्यातील कोळगाव जवळचे. बाजार, दवाखाना तसेच इतर कामासाठी गुंडेगावच्या लोकांना पायवाटेनं कोळगावला जावं लागे. पण रस्त्यात मोठ्या डोंगराचा अडसर. रुग्णांना, बाळंतिणीला अक्षरश: झोळीत टाकून न्यावं लागे. गुरुजींची आई ही कोळगावला बाजारात जायची. आईच्या पायात रूतलेला काटा आणि रक्तबंबाळ झालेला पाय पाहून गुरुजींच्या मनावर खोलवर जखम झाली. मग गुंडेगाव ते नगर रस्त्यासाठी त्यांनी लढाई सुरू केली. कधी पत्रव्यवहार तर कधी भेटी. परंतु यश मिळेना. सरकार जिथं कमी पडतं, तिथं ध्येयवेड्या माणसाचं काम सुरू होतं. १९५७-५८ मध्ये त्यांनी एक अवघड दगड दूर करून घाट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.भापकर गुरुजी तेव्हा एकटेच झटायचे. प्राथमिक शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी झोकून दिले. पगारातील अर्धी रक्कम ते रस्त्याच्या कामावरच खर्च करीत. एकाकी खिंड लढवणाऱ्या गुरुजींच्या मदतीला काही तरुण सहकारी तयार झाले. त्यांनी श्रमदान करणाऱ्या तरुणांना मजुरी द्यायला सुरुवात केली. निवृत्तीनंतर त्यांनी निवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम रस्त्याच्या कामावर खर्च केली आणि ४० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर गुंडेगाव ते खंडोबा मंदिर हा पाच किलोमीटरचा घाटरस्ता तयार झाला. ५० लाखांची पदरमोड !संतोषा डोंगराच्या दुसऱ्या बाजूला धावडेवाडी आहे. हा पाच किलोमीटरचा रस्ता सहकाऱ्यांच्या मदतीनं गुरुजींनी दोन वर्षांत पूर्ण केला. त्यानंतर आणखी पाच रस्ते गुरुजींच्या प्रयत्नांनी साकारले. कधी धान्य रूपाने मदत, तर कधी आर्थिक मदत अशी गुरुजींनी ५० लाख रुपये पदरमोड केली आहे.कधी निसर्गाचं रक्षण करणारा तर कधी आपल्या आचरणातून समाजकारणाचे धडे देणारा हा ध्येयवेडा ८५ वर्षांचा तरुण ‘आपण समाजासाठी खूप काही केले’ असं आजही मानत नाही. ‘मी ज्या रस्त्यांसाठी झिजलो, ते अद्याप शासनाच्या नियोजनात नाहीत. त्यामुळे या रस्त्यांना शासन दरबारी अजूनही अनधिकृतच ठरवले जाते.’ अशी खंत भापकर गुरुजी व्यक्त करतात.
४० वर्षे खाल्ल्या खस्ता, ५० लाखांची पदरमोड !
By admin | Updated: August 31, 2015 01:12 IST