मुंबई : वादग्रस्त प. वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य राजेंद्र सावंत, अध्यक्षा आशालता फाळके आणि कॉलेजचे सचिव अप्पासाहेब देसाई यांच्यावर तंत्रशिक्षण संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने वडाळा टीटी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सलग दोन वर्षे २०१४ ते २०१६ या कालावधीत शासनास आणि इतर प्राधिकरणास खोटी व चुकीची दिशाभूल करणारी माहिती देऊन माहिती मिळवली व त्या आधारे विद्यार्थ्यांकडून फी स्वीकारून लाभ मिळवून शासनाची फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवून आठवडा उलटला तरी देखील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाणे यांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. कॉलेजचे प्राचार्य आणि त्यांच्या संस्थाचालकांवर हा तिसरा गुन्हा नोंद होत असून अद्याप मुंबई विद्यापीठाने मात्र त्यांच्या संलग्नतेविषयी निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेचे सचिव अजय तापकीर यांनी केला आहे. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस बघ्याची भूमिका घेत असून आरोपींना अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेने दिला. (प्रतिनिधी)
वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्षांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:57 IST