कल्याण : उत्तम संसदपटू, संघटन कौशल्य, मनमिळावू स्वभाव म्हणून ओळख असलेल्या राम कापसे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत कल्याण परिषदेचे नगरसेवक ते अंदमान निकोबार नायब राज्यपाल पद भूषविताना आपल्यातील अभ्यासू व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविला.कापसे यांचा जन्म १९३३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे झाला. १९६२ मध्ये ते कल्याण नगरपरिषदेत नगरसेवक झाले. १९७४ पर्यंत एक तप त्यांची नगरसेवक म्हणून कारकीर्द राहिली. १९७८ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. कल्याण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. पुलोद सरकारच्या काळात त्यांनी सिडकोचे अध्यक्षपदही सलग दोन वर्षे भूषविले. १९८० मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. १९८५ साली तर त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली. नोव्हेंबर १९८९ मध्ये त्यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यात काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा पराभव करून ते विजयी झाले. लोकसभेचे दोनदा खासदार म्हणून निवडून येण्याचा मान पटकाविला. १९९६ साली ठाणे लोकसभा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर ते अडीच वर्षे राज्यसभेचे खासदार होते. जानेवारी २००४-०६ या कालावधीत ते अंदमान निकोबार चे नायब राज्यपाल होते. मुळचे शिक्षक पेशा असलेले कापसे हे १९५९ ते ९३ या कालावधीत रूपारेल महाविद्यालयात प्राध्यापकदेखील होते. जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपा या पक्षाच्या वाटचालीत ठाणे जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रूजविण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक ज्येष्ठ व अभ्यासू नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. राम कापसे यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार मंदा म्हात्रे, मोहन भंडारी, मधु चव्हाण, जगन्नाथ पाटील, रामनाथ मोते, विष्णू सावरा, खासदार कपील पाटील, उपमहापौर राहुल दामले, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण,गणपत गायकवाड आदिंसह उपस्थित होते. (प्रतिनिधी)----------सोशितांसाठी काम करणारा नेतातळागाळातल्या शेवटच्या माणसाला आपलासे वाटणारे व्यक्तीमत्त्व असेते होते. ते उत्तम संसदपटू होते आणि लोकप्रतिनिधींनी कसे काम केले पाहिजे याचे उत्कृष्ठ उदाहरण होते. अंदमानचे राज्यपाल झाल्यानंतरदेखील त्या ठिकाणी क्रांतीकारकांचे स्मारक झाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सामान्य माणसासाठी गरीबांसाठी शोषितांसाठी काम करणारा जमिनीवरचा असा एक नेता ज्यांच्याकडे पाहून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेले.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र-------------चांगला संसदपटू उत्तम वक्ताजनता पार्टी ते भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. ३५ वर्षाच्या राजकीय सहवासात रामभाऊंचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. चांगला संसदपटू, उत्तम वक्ता असा महाराष्ट्राला त्यांचा परिचय होता. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचेही नुकसान झाले आहे. - रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्षसाधी राहणी, उच्च विचारसरणीसाधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असलेला नेता असे रामभाऊंचे व्यक्तीमत्त्व होते. सर्वसामान्यांना आधार वाटेल असे त्यांचे काम होते. नगरसेवक, आमदार, खासदार, राज्यपाल अशी विविध मोठी पदे भूषविली होती. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हाआपला वाटणारा माणूसकामगार, कल्याणातील नोकरदार, बदलापूर, वांगणी इथला शेतकरी तसेच जव्हार डहाणूमधील आदिवासी या सगळ्यांना आपला वाटणारा नेता म्हणजे रामभाऊ होते. - विनोद तावडे, शिक्षण मंत्री------------सत्शील आणि मिश्कील जननेता हरपला - राम नाईक मुंबई : भाषाप्रभू राम कापसे यांच्या निधनाने एक सत्शील आणि मिश्किल जननेता हरपला. राम कापसे यांच्यासारख्या निर्मळ मनाचा राजकारणी पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व़्यक्त केली. १९७८ साली आम्ही दोघे प्रथमच आमदार झालो. आधी विधानसभेत व नंतर लोकसभेत आम्ही नेहमीष एकमेकांना पूरक काम केले. त्यामुळेच मुंबई उपनगरी लोकलसंदर्भात बरेच काम करता आले. अंदमानचे नायब राज्यपाल म्हणून काम करताना राम कापसे यांनी त्सुनामीच्या प्रकोपानंतर अंदमानचे जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी केलेले कार्य थक्क करुन सोडणारे आहे. -----------मी आणि रामभाऊंनी गेली ४० ते ५० वर्षे एकत्र काम केले आहे. १९८५ ते ८९ या कालावधीत आम्ही एकत्र विधीमंडळात होतो. त्यांच्या मेहनतीमुळे आज आपल्याला सावरकर स्मारक दिसते आहे. कधीही कोणाला जिव्हारी लागेल असे ते कोणाशीच वागले नाहीत, असे वेगळ व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. - हरीभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष
नगरसेवक ते नायब राज्यपाल
By admin | Updated: September 30, 2015 02:08 IST