नामदेव मोरे,नवी मुंबई- शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करणारी नवी मुंबई देशातील एकमेव महानगरपालिका आहे. तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर (क्षेपणभूमी) आधुनिक तंत्राचा वापर करून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. देशभर महापालिकेच्या नावाचा लौकिक वाढविणारा हा प्रकल्प बंद करण्याचे राजकीय षड्यंत्र सुरू आहे. प्रदूषणाचा खोटा डिंगोरा पिटून स्थानिक नागरिकांची व शहरवासीयांची दिशाभूल केली जात असून, या प्रकल्पाच्या समर्थनार्थ शहरभर चळवळ सुरू होवू लागली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्यात अपयश आले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा - भार्इंदरसह पनवेलवासीयांनाही कचरा टाकण्यासाठी क्षेपणभूमीच नाही. वर्तमानस्थितीमध्ये कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न देशातील सर्वच शहरांना पडला असताना नवी मुंबई महानगरपालिकेने मात्र पुढील ५० वर्षांचा विचार करून आधुनिक तंत्राच्या आधारे आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा केला आहे. कोपरखैरणेमधील डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर शासनाने १०३ एकर जमीन देण्याचे मंजूर केले असून त्यामधील ६५ एकर जमीन पहिल्या टप्प्यात उपलब्ध झाली आहे. या जागेवर दीड दशकापासून घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. महापालिकेने आतापर्यंत चार सेलचा वापर केला आहे. या सेलची कचरा साठविण्याची क्षमता संपल्यानंतर तो शास्त्रोक्त पद्धतीने बंद केला असून पाचवा सेल सुरू केला आहे. या सेलचा वापरही सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. घनकचऱ्याची हाताळणी करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कुठेही दुर्गंधी पसरणार नाही, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. देश - विदेशातील तज्ज्ञांनी या सेलला भेट देवून महापालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. देशातील आदर्श प्रकल्प म्हणून लौकिक असलेल्या तुर्भे क्षेपण भूमीविरोधात दोन महिन्यांपासून आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. क्षेपणभूमीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक देशभरातील तज्ज्ञांनी या क्षेपणभूमीचे कौतुक केले आहे. एवढा आदर्श प्रकल्प देशात कुठेच नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये याचा समावेश असताना त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक आंदोलनाचे इशारे देवू लागल्याने शहरभर नाराजीची भावना निर्माण होवू लागली आहे. डम्पिंगला विरोध करण्यासाठी तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना यांचे आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र घेतले जात आहे. पण वास्तवामध्ये आंदोलनासाठी देण्यात येणारी कारणे खोटी असल्याने हे आंदोलन फक्त स्वार्थासाठी असल्याचे मत अनेक जण व्यक्त करू लागले आहेत. >रेडलाइट एरियाला का विरोध नाही?महापालिकेच्या अधिकृत व सर्व नियमांचे पालन करून करण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध केला जात आहे. पण तुर्भे स्टोअर्सच्या टेकडीवर शहरातील एकमेव रेडलाइट एरिया आहे. येथील हिंदी शाळेच्या गेटबाहेरही वेश्याव्यवसाय सुरू आहे. रोडच्या बाजूला देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या असतात. शहरात सर्वत्र गांजा विक्रीवर कारवाई होत असताना या परिसरात बिनधास्तपणे गांजा विकला जात आहे. अधिकृत क्षेपणभूमीला विरोध करणारे जनहितासाठी रेडलाइट एरिया बंद व्हावा यासाठी काहीच प्रयत्न का करत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. >आंदोलन स्टंटबाजीसाठी डम्पिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. वास्तविक हा सेल जुलै २०१४ मध्ये सुरू झाला आहे. सेलची क्षमता संपत आली असून जास्तीत जास्त सहा महिन्यांमध्ये येथे कचरा टाकण्याची क्षमता संपणार आहे. जो सेल नैसर्गिकरीत्या बंदच होणार आहे त्यासाठी प्रदूषणाचे कारण सांगून आंदोलन कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून आंदोलन म्हणून नागरिकांची दिशाभूल करून स्टंटबाजी असल्याचे जाणकारांचे मत आहे. >महापालिकेच्या क्षेपणभूमीची वैशिष्ट्ये नागरी घनकचरा हाताळणी अधिनियमांचे काटेकोर पालनकचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती कचऱ्यातील घातक लिचेटवर प्रक्रिया करून त्या पाण्याचाही पुनर्वापरशास्त्रोक्तपद्धतीने कचऱ्याची केली जातेय विल्हेवाट क्षमता संपलेले चार सेल शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात यश बंद केलेले सेल १५ वर्षांनी पुन्हा उघडून त्याचा उपयोग केला जाणारडम्पिंग ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहेप्रदुषणाची वस्तूस्थिती समजण्यासाठी प्रदुषण पातळीचे नियमीत मोजमाप>डम्पिंगमुळे दुर्गंधी नाहीमहापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी पसरणार नाही याची काळजी घेतली जाते. सर्वत्र पाण्याचे फवारे मारले जात आहेत. पर्यावरणविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन होत असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होवू दिला जात नाही. प्रदूषणाची माहिती मिळावी यासाठी उपकरण बसविले असून त्याचा रोजचा अहवाल पर्यावरण नियंत्रण मंडळाला पाठविला जात आहे.>कचऱ्यावर प्रक्रिया शहरातून संकलित केलेला कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जात नाही. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात आहे. प्लास्टीक, कापड व इतर सुका कचरा प्रत्यक्ष डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. या कचऱ्यातूनही जास्तीत जास्त प्लास्टीक संकलित करून त्याचीही प्रक्रिया केली जाते.
क्षेपणभूमी बंद पाडण्याचे षड्यंत्र
By admin | Updated: October 20, 2016 02:36 IST