स्नेहा मोरे,
मुंबई- नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइनवर मे महिन्यात एसएमएस, संकेतस्थळ आणि हेल्पलाइनद्वारे तब्बल १९ हजार ७५ तक्रारींचा पाऊस पडला आहे. त्यावरून, गेल्या काही दिवसांत ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील दरी वाढत असल्याचे दिसून आले आहे. ११ वर्षांतील ग्राहकांच्या तक्रारींचा हा उच्चांक असल्याचे नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइनने म्हटले आहे.नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन (एनसीएच)वरील या १९ हजार ७५ तक्रारींपैकी १४ हजार ३ तक्रारी टोल फ्री क्रमांकावर दाखल झाल्या. शिवाय, एनसीएचच्या संकेतस्थळावर विविध कंपन्यांविरोधात ५ हजार ७२ तक्रारींची नोंद झाली. यात दिल्ली येथून सर्वांत जास्त १६.६२ टक्के म्हणजे ३ हजार ७१ तक्रारींचे कॉल्स आले. त्यानंतर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि हरयाणा येथून ६ ते १५ टक्के तक्रारींचे कॉल्स प्राप्त झाले. उत्पादक क्षेत्राविषयी सर्वाधिक ४ हजार २७७ (२२.४२ टक्के) तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर ई-कॉमर्स क्षेत्राविषयी १८.४३ टक्के तक्रारींचे प्रमाण होते. याप्रमाणेच, टेलिकॉम, बँकिंग आणि आॅटोमोबाइल क्षेत्राविषयी ५ ते १७ टक्के तक्रारी आल्या. एसी आणि रेफ्रीजेटर्सची दुरुस्ती न करणे हे मे महिन्यात उत्पादक क्षेत्राविषयीच्या तक्रारींत वाढ झाल्याचे मुख्य कारण असल्याचे एनसीएचच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, मे महिन्यात पुरुषांनी सर्वाधिक तक्रारी केल्या. पुरुषांच्या तक्रारींचा टक्का ९१.६२ टक्के होता, तर महिलांच्या तक्रारी केवळ ८.३७ टक्के एवढ्या दिसून आल्या. गेल्या महिन्यात नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळालाही ५ लाख ५९ हजार २०६ हिट्स मिळाले.एप्रिल महिन्यात १८ हजार तक्रारी...एप्रिल २०१६मध्ये एनसीएचकडे १८ हजार ८०३ तक्रारी दाखल झाल्या. त्यात सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशहून दाखल झाल्या होत्या, त्यांचे प्रमाण ३००२ एवढे होते. या महिन्यात महाराष्ट्र तक्रार करण्यात तिसऱ्या स्थानावर होता. तर या महिन्यात सर्वाधिक तक्रारी पुरुषांनी केल्याची नोंद आहे.