मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अवयवदान जनजागृती मोहिमेला आता यश येताना दिसत आहे. १० महिन्यांमध्ये पहिल्यांदाच ४७ जणांनी अवयवदान केले आहे. गेल्या वर्षी हा आकडा ४२ इतका होता. पुढील दोन महिन्यांत अवयवदाते ५० वर जातील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये अवयवदानाचा आकडा ४० च्या वर गेला होता. त्याआधी मेंदू मृतावस्थेत असणाऱ्यांच्या अवयवदानाचा टक्का कमी होता. पण आता चित्र बदलते आहे. यंदा एका फुप्फुसाचेही दान झाले आहे. तीन वर्षांपूर्वी फुप्फुसाचे दान झाले होते. पण त्यानंतर एकदाही फुप्फुसाचे दान झाले नव्हते. १ सप्टेंबरला राज्यात प्रथमच फुप्फुस आणि हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एकत्र झाली होती. मेंदू मृतावस्थेत गेल्यावर त्याचे निदानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अवयवदानाचा टक्का वाढलेला आहे. बुधवारी नांदेडहून हृदय मुंबईत आणण्यात आले. खारघर येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय पुरुषास हे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले आहे. गेल्या एका महिन्यापासून हा प्रतीक्षा यादीत होता. या रुग्णाला कार्डिओ मायोपॅथी हा आजार आहे. गेल्या एक वर्षापासून त्याला त्रास जाणवत होता. वर्षातली ही २५ वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. (प्रतिनिधी)>१ जानेवारी ते १९ आॅक्टोबरपर्यंत झालेले अवयवदान अवयवदान : ४७ मूत्रपिंड : ७६यकृत : ४५हृदय : २८फुप्फुस : १
१० महिन्यांत ४७ जणांचे अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:58 IST