मुंबई : पुणे जिल्ह्णातील मावळ येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी चौकशी करणाऱ्या आयोगाने तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक,पोलीस निरिक्षक अशोक पाटील,पोलीस निरिक्षक यशवंत गवारी व पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. सरकारने हा अहवाल स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणारा कृती अहवालही विधानसभेत सादर केला.पिंपरी-चिंचवड बंद पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी द्रुतगती मार्गावर आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना पांगविण्यासाठी मावळ येथे पोलिसांनी सुरूवातीला केलेला गोळीबार समर्थनीय होता. परंतु जमावाची पांगापांग झाल्यानंतरही ज्या पद्धतीने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला गेला तो असमर्थनीय आहे, असा स्पष्ट ठपका मावळ गोळीबाराची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश एम.जी.गायकवाड आयोगाने ठेवला होता. पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी मावळ येथील गावक-यांनी ९ आॅगस्ट २०११ रोजी निदर्शने केली होती.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद पाडण्याचाही प्रयत्न झाला होता. आंदोलकांवर याप्रसंगी पोलिसांनी गोळीबारही केला होता.या गोळीबारात १४ जण जखमी झाले होते तर तीन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. सरकारने या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. जी. गायकवाड यांचा चौकशी आयोग नेमला होता. सरकारने आयोगाचा अहवाल आपल्या कृती अहवालासह शनिवारी विधानसभेत सादर केला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला जो बळाचा वापर केला त्याचे आयोगाने समर्थन केले आहे. मात्र जमावाची पांगापांग झाल्यानंतरही तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी एस.एल.आर या रायफलीमधून केलेला गोळीबार असमर्थनीय आहे तसेच पोलीस निरीक्षक अशोक पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत गवारी व पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांनी केलेला गोळीबारही समर्थनीय नाही असा स्पष्ट निष्कर्ष चौकशी आयोगाने व्यक्त केला असून, त्याची दखल सरकारने घेतली आहे. या अधिकाऱ्यांवर कायदेशीर पद्धत अनुसरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे कृती अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांसह चौघांवर आयोगाचा ठपका
By admin | Updated: June 15, 2014 02:32 IST