मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे भाजपा सरकार आरक्षणविरोधी असून, मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत केवळ वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.मुंबईत झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले आहे. परंतु काँग्रेस सरकारने धर्माच्या आधारे नाही, तर मागासलेपणाच्या आधारावर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेस सरकारने काढलेला अध्यादेश भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जाणीवपूर्वक व्यपगत केला. नवीन कायदा करू असे सांगूनही आता दीड वर्ष झाले आहे. यातून हा पक्ष किती खोटारडा आहे हे सिद्ध होते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांना व्होट बँक समजू नका; त्यांना समान वागणूक द्या, असे म्हणतात; मात्र त्याचवेळी राज्यातील भाजपा सरकार मुस्लीम समाजाच्या हक्काचे आरक्षण त्यांना देत नाही. यावरून भाजपाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू
By admin | Updated: October 8, 2016 04:49 IST