अकोला : यावर्षीची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत थोड बदल करण्यात आला असून, प्रक्रिया अधिक विद्यार्थीकेंद्रित करण्यात आली आहे. नव्या तंत्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेची प्रक्रिया लांबल्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया मागील वर्षीच्या तुलनेत उशिरा सुरू होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येते. या प्रक्रियेत मागील वर्षी अर्ज भरणार्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीत पहिल्या तीन पसंतीक्रमापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक होते. प्रवेश करो अथवा ना करो, हे विद्यार्थी आपोआपच प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडत; परंतु यंदा तीन पसंतीक्रमाचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पहिल्या पसंतीक्रमावर जागा वाटप झाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीक्रमावर जागा वाटप झालेले विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थी दुसर्या प्रवेश फेरीकरिता पात्र ठरतील. तंत्रशिक्षण संचालनालय यंदा अभियांत्रिकीकरिता तीन प्रवेश फेर्या घेणार आहे. चौथी फेरी ही समुपदेशनाची असेल. पहिल्या तीन फेरीकरिता मागील वर्षीप्रमाणेच शंभर पसंतीक्रम भरणे बंधनकारक राहणार आहे. शंभरपैकी कोणते पसंतीक्रम भरणे बंधनकारक करायचे, या संदर्भातील नियमात तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे यावर्षी बदल करण्यात आला आहे. मागील वर्षी पहिल्या तीन पसंतीक्रमावर जागा वाटप झाल्यास प्रवेश स्वीकारणे बंधनकारक होते; यावर्षी ही अट काढून टाकण्यात आली आहे. दुसर्या प्रवेश फेरीत मागील वर्षीच्या २० ऐवजी पहिल्या तीन पसंतीक्रमावरील महाविद्यालयात जागा वाटप झाल्यास प्रवेश स्वीकारणे बंधनकारक असेल तर तिसर्या आणि कॅपच्या शेवटच्या फेरीत ७ पैकी ज्या ठिकाणी प्रवेश मिळेल तो स्वीकारणे बंधनकारक असणार आहे. यावर्षी अभियांत्रिकी प्रवेश अधिक विद्यार्थीकेंद्रित करण्यात आले आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना दुसर्या फेरीत मनासारख्या महाविद्यालयात व अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची संधी असते; परंतु पसंतीक्रमाचे बंधन असल्याने विद्यार्थी पुढच्या फेरीसाठी पात्र ठरत नाहीत. नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना हे टाळता येणार आहे.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल
By admin | Updated: May 29, 2014 01:24 IST