नामदेव मोरे, नवी मुंबई संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, आवक ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचा भाव ७० रुपयांवर गेला आहे. येत्या काही दिवसांत हाच भाव शंभरी गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कांदा उत्पादक राज्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून देश-विदेशात कांदा निर्यात केला जातो. परंतु गतवर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, जुलैच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढू लागले. राज्यातील बहुतांश सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सध्या मुंंबईमध्ये नाशिक व पुणे परिसरातून कांदा विक्रीसाठी येत आहे. काही प्रमाणात कर्नाटकमधूनही कांदा येऊ लागला आहे. सर्वत्रच तुटवडा असल्यामुळे प्रयत्न करूनही पुरेशी आवक होत नाही. नोव्हेंबरपर्यंत कांदा ग्राहकांना रडवण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच माल विकला असून, बहुतांश माल थेट शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून विक्रीसाठी येत आहे. लासलगावी कांदा भावात १५०० रूपयांची तेजीलासलगाव येथील कांदा बाजारपेठेत कमाल भावात ६१५ रुपयांची तेजी होऊन ५५०० रु. प्रतिक्विंटल हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. गुरुवारी २२५ वाहनांतील कांदा किमान ३१०० ते सर्वाधिक ५५०० रुपये व सर्वसाधारण ४९०० भाव जाहीर झाला.
कांदा शंभरी गाठण्याची शक्यता; आवक प्रचंड घटली
By admin | Updated: August 21, 2015 01:32 IST