कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही. ज्या शहरांची निवड झाली त्यांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात पक्षपातीपणा केला आहे. ही योजनाच खोटी, बोगस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शुक्रवारी रात्री क्रशर चौक येथे कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या शहरांची लोकसंख्या दहा हजार नाही, अशा शहरांचा या योजनेत समावेश केला असून, त्यांना मुंबईच्या बरोबरीने निधी दिला जाणार आहे. शिवाय योजनेद्वारे मिळणारा निधी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून खर्च करावयाचा आहे. महापौर, आयुक्तांना तेथे कोणतेही अधिकार असणार नाहीत. हा खासगीकरणाचा भाग आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून पश्चिम महाराष्ट्राकडे आकसाने पाहणे सुरू झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कॉँग्रेस सरकारच्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यामुळे येथे अनेक विकासाची कामे सुरू झाली आहेत. आता ही कामे पूर्णत्वाकडे न्यायची असतील तर सत्ता पुन्हा एकदा कॉँग्रेसच्या हाती सोपवा. राज्यात आणि देशात कॉँग्रेसने अनेक लोकप्रिय योजना सुरू केल्या होत्या. त्या भाजप सरकारने बंद केल्या आहेत. अनेक चांगल्या योजनांची नावे बदलली आहेत. योजना बंद केल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांना त्याचा फटका बसला. कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही अकराशे कोटींचा निधी आणला; म्हणूनच या योजना बंद न पडता त्या पूर्णत्वाकडे न्यायच्या असतील तर कॉँग्रेसकडे एकहाती सत्ता आली पाहिजे. अल्पसंख्यांकाना जाळून मारून टाकले जात आहे; परंतु पंतप्रधान साधा खेदही व्यक्त करीत नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर यांचे फोटोही त्यांच्या जाहीरनाम्यातून गायब झाले. त्यामुळे त्यांच्या विचारांची दिशा कुठे चाललीय, हे दिसून येते, असेही ते म्हणाले. कोल्हापुरी बाणा दाखवाकोल्हापूर हे प्रगतीकडे जात असलेले शहर आहे. म्हणूनच महापालिका निवडणुकीत कोल्हापूरचा बाणा दाखवा. चुकून जरी भाजपच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न झाला तर कोल्हापूरवर हा मोठा अन्याय होईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) (पान / ३ वर)+तुमचे हात कोणीबांधले होते? माजी मंत्री सतेज पाटील यांनी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता दिली तर एक हजार कोटींचा निधी आणू, असे पालक मंत्री सांगत आहेत; पण गेल्या वर्षभरात निधी आणण्यासाठी तुमचे हात कोणी बांधले होते का? तुमच्या हातात सत्ता असताना शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करता आला नाही. त्यातूनच त्यांची मानसिकता दिसून आली. कोल्हापूरला केवळ पाने पुसण्याचे काम झाले. विमानतळाच्या विकासाकरिता काही केले नाही, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी दिला नाही. म्हणूनच आता मते मागायला येणाऱ्या भाजपला ‘कोल्हापूरला काय दिले?’ याचा जाब विचारा, असे आवाहन पाटील यांनी केले.
केंद्राची स्मार्ट सिटी योजनाच बोगस : चव्हाण
By admin | Updated: October 24, 2015 01:21 IST