दोडामार्ग : पैशाने जर निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर नीलेश राणे कधीच पडला नसता. त्यामुळे अमुक पैसे आले, तमुक पैसे आले अशा अफवा पसरवित असतील, तर त्या अफवांना बळी पडू नका. कारण कोणत्याच निवडणुका पैशाने जिंकता येत नाहीत. निवडणुका जिंकायच्या असतील, तर घरोघरी संपर्क ठेवा आणि जनतेचा सेवक म्हणून काम करा, असे आवाहन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.येथील दळवी कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, चंदू मळीक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद गवस आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश राणेंनी सेना-भाजपा युतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात कोकणात सहज निधी येत होता. मात्र, आता अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले. कोकणात येणारा निधी बंद झाला. त्यामुळे इथली विकासकामे ठप्प झाली. इथल्या सेनेच्या पालकमंत्र्यांना तर खुळ लागलंय. ते समजतात पालकमंत्र्याची खुर्ची देवाने दिली. ही खुर्ची जरी देवाने दिली असली, तरी ती लोकांच्या सेवेसाठी आहे हे ते विसरले आहेत. या खुर्चीचा वापर ते मिरवण्यासाठी करीत आहेत. त्यामुळेच आज सेना-भाजपच्या विरोधात संपूर्ण वातावरण आहे. दोडामार्ग ते मंडणगड सगळीकडेच काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. मात्र, कोणीही गाफील राहता कामा नये. प्रत्येकाने घरोघरी संपर्क ठेवा आणि जनतेचे सेवक म्हणून काम करा, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)
पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत : राणे
By admin | Updated: October 24, 2015 00:43 IST