ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित मारेकरी समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास गुरुवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या खटल्याची अद्याप चौकशी सुरु आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून त्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट यायचा असल्याने जिल्हा न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करू नये असे म्हणणे पानसरे कुटुंबियांचे होते. राज्य सरकारनेही हीच गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायाधीश साधना जाधव यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यास स्थगिती दिली. आता या हत्येशी संबंधित एकूण तीन खटल्यांची सुनावणी २३ जूनला उच्च न्यायालयात होत आहे. त्यामध्ये समीर गायकवाड याला जामीन मिळावा म्हणून त्याच्यावतीने करण्यात आलेली याचिका, मुळ तपासाबध्दल उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरु असलेली याचिका व गुरुवारी दाखल झालेल्या अपिल याचिकेवरची सुनावणीचा त्यामध्ये समावेश आहे.