ठाणे : आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नाशिकहून मुंबईला व पुण्याला सुटणाऱ्या सर्व एसटी बसेस महामार्गस्थानकाऐवजी जुन्या सीबीएससमोर असलेल्या मेळा बस स्थानकावरून सुटणार आहेत. नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे हे दोनही मार्ग एसटीसाठी प्रचंड फायद्याचे होते. परंतु खासगी बसेसच्या अतिक्रमणामुळे ते तोट्यात जाऊ लागल्याने त्याला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचे समजते.या दोनही मार्गांवर एकीकडे खासगी बसेस भरपूर धंदा करतात आणि एसटीचे प्रवासी मात्र घटत चालले आहेत. याची कारणे शोधली असता असे लक्षात आले की, प्रवाशांचा ताण व शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस महामार्ग स्थानकावरून सोडण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला गेला. या स्थानकासमोरच खासगी बसेसचा तळ आहे. तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या बसेसना पार्क करण्यासाठी जागा आहे. तसेच त्यांचे एजंट (वळूक) अगदी सहजपणे महामार्ग स्थानकात येऊन प्रवासी वळवून नेतात. हे टाळण्यासाठी जर ही वाहतूक सध्या फारशा वापरात नसलेल्या मेळा स्थानकात स्थलांतरीत केली तर खासगी बसेसना त्या परिसरात येणे, त्यांच्या वळूकना तिथे वावरणे व प्रवासी वळवून नेणे शक्य होणार नाही. परिणामी एसटीचे प्रवासी वाढतील व या मार्गावरील प्रवासी घट रोखली जाईल अशी भूमिका एसटीची आहे. त्यासाठी मेळा स्थानकाची काहीशी डागडुजी करावी लागेल. त्यासाठी हा कालावधी एसटी वापरेल असे समजते. पुण्याला जाणाऱ्या बसेस पाठीमागेच असलेल्या ठक्कर बाजार स्थानकातून सुटत असल्याने त्या प्रवाशांची सोय ही यामुळे साधली जाईल, असेही एसटीला वाटते आहे. ‘हे स्थलांतरण होण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी त्याबाबत तूर्तास मी माध्यमांशी काहीही बोलू शकणार नाही.’ असे यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, नाशिक यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईच्या एसटी बसेस मेळातून सुटणार
By admin | Updated: June 17, 2014 03:26 IST