सातारा : हाता-तोंडाशी गाठ पडावी म्हणून रोज परिस्थितीशी झगडा करणाऱ्यांच्या नशिबी कुठलं आलंय ‘नवं’पण. धरतीच्या अंथरूणावर अंग टेकायचं अन् आभाळाची चादर अंगावर ओढून उद्याच्या ‘घासा’ची स्वप्नं बघायची, असं उघडं आयुष्य जगणाऱ्यांची कुटुंबं ऊन, वारा, थंडी, पावसाचा मार खात जगतायत रस्त्याकडेला अन् ओढ्या-नाल्यात. त्यांच्या उघड्या अंगाला हवी आहे माणुसकीची ऊब. आपण सर्वांनी मिळून ऊबदार मदतीचा हात दिला तर निश्चितच झोपड्यांमध्ये कुडकुडणाऱ्या चिमुकल्या जीवांना मायेची ऊब मिळेल.सातारा शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधून लहान मुलं कपड्यांविना उघडी नागडी जगत आहेत. अंगाला झोंबणाऱ्या थंडीनं कुडकुडत आईच्या कुशीत शिरतायत. गोडोली नाक्याजवळ गेली वीस वर्षे ओढ्याच्या दलदलीत पंधरा कुटुंबं झोपड्या टाकून त्यात राहत आहेत. पंचवीस ते तीस लहान मुलं या झोपडपट्टीत आहेत. कुणाच्या अंगावर फक्त मळकट चड्डी आहे, कुणाच्या अंगात फक्त फाटका सदरा तर कुणाला कपडेच नाहीत. थंडीचे दिवस सुरू झालेत. अंगाला बोचणाऱ्या या थंडीत कशी राहत असतील ही मुलं? याबाबत विचारले असता येथील गौरी कनाके बोलू लागल्या... ‘दिवस कसा बी निघतूया; पर रात्रीच्या टायमाला थंडीनं डोळ्याला डोळा लागत नाय. मोठ्या माणसाचं काय नाय पर पोराबाळांचं लय हाल व्हत्यात बगा. पोरं गारठून जात्याती. आता माझ्या फाटक्या पदरात तरी कुणाला घ्याचं. माकडीणीला तिची पिलं चिकटावी तशी लेकरं कुडकुडत येऊन चिकटून झोपत्यात. आंगात गरम कपडेच नायत तर मायेच्या उबीनं आंगातली हुडहुडी जाणाराय व्हय? ’ज्योती उईके म्हणाल्या, ‘जागा नसल्यामुळं हितं वढ्यातंच झोपडी टाकली. बाजूनं पाणी व्हातंय. त्यामुळं लय गार लागतंया. दिवसभर उन्हाचा चटका आन् रातच्याला गारठा पडतूया. पोरांच्या अंगावर कपडा नाय. कुणी जुनं-पानं दिल तेवढंच; नवं घ्याचं तर गाठीला पैका पायजे. कान टुकरून आन् भंगारतनं मिळत्यात किती पैसं? पोटाला खाया मिळायची मुश्किल. कापडं कशी घेणार?’ ही व्यथा आहे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. शहरात अशा अनेक ठिकाणी झोपड्यांमध्ये चिमुकली मुलं थंडी सहन न झाल्याने रात्र जागून काढतायत. त्यातच सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यामुळे झोपड्यांतील चिमुकल्यांना आजारपण अंगावरच काढावे लागत आहे. थंडीपासून संरक्षण व्हावे आणि आजाराला बळी पडू नये यासाठी त्यांना हवाय मदतीचा हात. (लोकमत टीम)सातारकरांचे जुने कपडे देऊ शकतात आनंद!झोपड्यांमधील मुलांना उबदार कपडे मिळत नसल्याने ती थंडीनं कुडकुडतात. पण अनेकांच्या घरात वापरात नसलेली ऊबदार कपडे कपाटात, गाठोड्यात बांधून ठेवून दिलेली असतात. तर काहीजण घरात अडचण नको म्हणून फेकूनही देतात. असे न करता ज्यांच्याकडे स्वेटर, चादर, ब्लँकेट, गोधडी अशी कपडे आहेत, त्यांनी झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी देऊन त्यांचं जगणं सुसह्य करावं, तसेच विविध संस्था, संघटनांनीही या यामध्ये सहभाग घेऊन मुलांना मायेची ऊब द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे.शहरात सुमारे 1000मुलं उघड्यावर!शहरातील विविध ठिकाणच्या झोपड्यांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन ‘लोकमत’नं केलेल्या सर्वेक्षणात जवळपास एक हजार मुलं कपड्याविना राहत असल्याचे दिसून आले. ज्यांच्याकडे अंगभर घालायला कपडेही नाहीत, त्यांनी ऊबदार कपड्यांची स्वप्नं कशी बघायची. पण आपण त्यांना मदत करून त्यांचं हे ऊबदार स्वप्न पूर्ण करू शकतो.येथे गरज आहेमदतीची..आदिवासी कुटुंबे, गोडोली चौकानजीककातकरी वस्ती, म्हसवे रोडउड्डाण पुलाखाली राहणारी कुटुंबंअजंठा चौक झोपडपट्टीत रस्त्याकडेला, बसस्थानक परिसरात थंडीने कुडकुडणारे निराधार लोकराजस्थानी कुटुंबे, कोरेगाव रस्ताशासकीय रुग्णालय परिसरात बसलेले गरीब, गरजू लोक
उघड्या अंगाला हवीय माणुसकीची ऊब!
By admin | Updated: November 12, 2014 22:57 IST