ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर शरसंधाण साधलं आहे. भारतीय सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल सोलापुरातल्या एका प्रचार सभेवेळी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर याच मुद्द्यावर काँग्रेसनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. सैनिकांचे शौर्य आणि त्यागाला भाजपाने राजकारणाच्या आखाड्यात उतरविले, असं म्हणत सुरजेवाला यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच सेना-भाजपाची सत्ता म्हणजे भ्रष्ट प्रशासनाचं उत्तम उदाहरण आहे. भांडणाआडून सुरू असलेला खोटा घटस्फोट दोन्ही पक्षांनी तात्काळ थांबवावा, असंही ते म्हणाले आहेत. अलका केरकर शिवसेनेच्या आशीर्वादाने उपमहापौर आहेत. तर आजही यशोधर फणसे भाजपाच्या सहकार्याने स्थायी समितीवर टिकून आहेत. एकमेकांच्या गुन्ह्यातून युतीची सुटका होणार नाही. केडीएमसीमध्ये असाच खेळ केला. मुंबईकर जनता त्यांचा खोटा घटस्फोट खपवून घेणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाने ५०० कोटी खर्च केले, हा खर्च कॅशमध्ये केला की प्लास्टिक मनीने ते आधी सांगावं, असं आव्हानही त्यांनी भाजपाला दिलं आहे.
सैनिकांचे शौर्य व त्यागाला भाजपाने राजकारणाच्या आखाड्यात उतरविले- सुरजेवाला
By admin | Updated: February 19, 2017 17:11 IST