ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - युतीतील तिढा संपण्याची चिन्हे नसून आता भाजपने शिवसेनेला १२ तासांचे अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे. जागावाटपावर १२ तासांत तोडगा न काढल्यास स्वबळावर निवडणूक लढवू धमकीवजा इशाराच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला दिल्याचे समजते.
विधानसभा निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली असली युतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. लोकसभेत यशानंतर भाजपने शिवसेनेसमोर १३५ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर असहमती दर्शवली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर असून गुरुवारी कोल्हापूर येथील सभेत चर्चेसाठी भाजप एक पाऊल पुढे आला आहे, इतरांनीही एक पाऊल पुढे टाकावं आणि युतीचा तिढा मिटवून टाकावा असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला केले होते.तसेच जागावाटप सन्मानपूर्वक व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. गुरुवारी दुपारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला १२ तासांचे अल्टिमेटम दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या अल्टिमेटमनंतर शिवसेनेच्या गोटात वेगाने चक्र फिरली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.