मनोहर कुंभेजकर,मुंबई- महानगरपालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरू आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणार नाही हे गृहीत धरून मुंबई भाजपाने पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. सध्या पालिकेत भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात षण्मुखानंद येथे झालेल्या भाजपा मेळाव्यात पालिका निवडणुकीत ११४ नगरसेवक कसे निवडून येतील, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून जोमाने कामाला लागा, असे आवाहन केल्यावर भाजपाने तयारी केल्याचे चित्र आहे.भाजपाने आता सर्व धर्मीयांमधील मतदारांशी थेट संपर्क सुरू केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री हे मुंबई भाजपाच्या विविध उपक्रमांत उत्साहाने सहभागी होत आहेत. यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी पश्चिम उपनगरला क्वचितच भेट दिली असेल; मात्र फडणवीस हे आतापर्यंत किमान १५ ते २० वेळा पश्चिम उपनगरातील भाजपाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. मुंबईत गुण्या गोंविदाने राहणाऱ्या उत्तर भारतीयांना मुंबईतून हद्दपार करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी मुंबई भाजपातर्फे गोरेगाव (पूर्व) येथील एनएससी संकुलात उत्तर भारतीयांसाठी आयोजित बाटी चोखा संवाद कार्यक्रमात केले. मुंबईत प्रथमच बाटी चोखा खात या सभेत त्यांनी उपस्थितांशी भोजपुरीत संवाद साधला; शिवाय शेरोशायरी करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. यानिमित्ताने मुंबईत असलेल्या ४० लाख उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून स्वबळावर पालिका निवडणुकीत विजय मिळविण्याचे रणशिंग भाजपाने फुंकले आहे.
महापालिकेसाठी भाजपा ‘सैराट’
By admin | Updated: September 5, 2016 02:10 IST