ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी उतावीळ होते व यात सत्ताधारी भाजपाने दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजुर करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिली होती. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीशी युती नाही असे सांगणारे मुख्यमंत्री फडणवीस आता राष्ट्रवादीचे चुंबन घेताना दिसत असून हे चित्र बघून महाराष्ट्रातील मतदारांना आपण द्रौपदी झालो व भर बाजारात आपले वस्त्रहरण झाल्याचे वाटते असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारातमीत जाऊन शरद पवार आपले मार्गदर्शक असल्याचा गौप्यस्फोट केला याकडेही उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले. सध्या महाराष्ट्रात जे चालले ते राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही असेही त्यांनी म्हटले आहे.