नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाह पदासाठी भय्याजी जोशी यांनाच परत संधी मिळणार असल्याची चर्चा असली तरी सहसरकार्यवाह असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये नागपूर येथे होणाऱ्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत संघाच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर होणाऱ्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. महानगर संघचालकांच्या निवड प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष या प्रतिनिधी सभेकडे लागले आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार अससल्याचे समजते़सरकार्यवाह पदासाठी २०१२ मध्ये होसबळे यांचे नाव समोर आले होते. परंतु भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली होती.गेल्या तीन वर्षांत होसबळे यांनी संघाच्या प्रसारात अन् निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका आणि लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पाडली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुखपद, सह बौद्धिक प्रमुख या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. (प्रतिनिधी)तरुण चेहऱ्याला संधी?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा तरुण करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या जागेवर दत्तात्रय होसबळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भय्याजी जोशी हे सत्तरीजवळ पोहोचले आहेत. होसबळे हे तुलनेने तरुण आहेत; शिवाय ते पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?
By admin | Updated: February 18, 2015 02:15 IST