प्राची सोनवणे,
नवी मुंबई- सण असो वा उत्सव तो साजरा करताना होणारे प्रदूषण, आजूबाजूच्या जीवसृष्टीवर तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे निसर्ग संकट याविषयी सर्वच स्तरातून जनजागृती केली जात आहे. मुंबईतील अशाच काही महिलांनी निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला असून गणेशोत्सवातील संपूर्ण सजावट ही इको फ्रेंडली कशी करता येईल यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींबरोबरच सोलावूडमधून गुंफलेल्या मोगऱ्याच्या कळ्या, ड्युप्लेक्स कागदापासून साकारलेले आकर्षक गुलाब पुष्प, कापडापासून तयार केलेली लेस तसेच कार्डपेपरचा वापर अशी नानाप्रकारची पर्यावरणस्नेही आभूषणे यंदा बाप्पाच्या अंगावर पाहावयास मिळणार आहेत. हस्तकलेची आवड असणाऱ्या प्रीती कदम यांनी त्यांच्या कलेचा वापर करून पर्यावरण संवर्धनाला कशाप्रकारे हातभार लावता येईल यादृष्टीने आतापर्यंत पाचशेहून अधिक इको फ्रेंडली मखर तयार केले आहेत. बाप्पाच्या सजावटीच्या साहित्यामध्ये सोलावूडपासून लहान-मोठ्या आकाराच्या मोगऱ्याच्या कळ्या, ड्युप्लेक्स कागदापासून साकारलेली गुलाबाची फुले, विविधरंगी कापडाची लेस यांचा वापर करून मुकुट, तोडे, बाजूबंद, कंठी आदी आभूषणे तयार केली आहेत. गणेशोत्सवात प्लास्टीकची फुले, वेली, मणी आणि खड्यांनी सजविलेल्या कंठ्या खरेदी केल्या जातात. त्या पर्यावरणाला घातक ठरत असल्याने पर्यावरणस्नेही साहित्यापासून आभूषणे बनविण्याचा निर्णय घेतल्याचे प्रीती कदम यांनी सांगितले. >मागणीत वाढघरकाम करणाऱ्या पंधरा महिलांनाही दागिने बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. फावल्या वेळात १५ महिला सध्या बाप्पाची आभूषणे तयार करत असून बाहेर मिळणाऱ्या कृत्रिम आभूषणांच्या तुलनेत ही पर्यावरणस्नेही आभूषणे स्वस्त दरात उपलब्ध असून दरवर्षी त्यांची मागणी वाढत आहे.