ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती समाजावर अनेक उपकार केले. मात्र या उपकारांचा गुजराती समाजाला विसर पडला अशी खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नावानेच मतदान झाले व त्यामुळेच भाजपाला यश मिळाले अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये राऊत म्हणतात, गुजराती समाज महाराष्ट्रात राहुनही जात व प्रांतासाठी गुजराती समाज शिवसेनेविरोधात गेला व भाजपाला मतदान केले. प्रचंड काम करुनही सुभाष देसाई, विनोद घोसाळक, पांडुरंग सपकाळ यांचा पराभवा हे याचेच लक्ष आहे.
शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर किमान २०० जागांवर विजय मिळाला असता. मात्र दुर्दैवाने हे शक्य झाले नाही व शेवटी जनतेने दोघांनाही एकत्र या आणि सत्ता स्थापन करा या वळणावर आणून ठेवले. एमआयएममुळे भाजपाला फायदा झाला असेल. मात्र या नादात हिरवा विषारी साप विधानसभेत गेला. या निवडणुकीत एमआयएमचा उदय व मनसेचा अस्त झाला अशी मतही त्यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले तर विदर्भाचा विकास होईल असेही त्यांनी म्हटले आहे.