संदीप प्रधान - मुंबई
विधानसभा निवडणुकीकरिता शिवसेनेने जागा वाढवून देण्याची तयारी दाखवल्याखेरीज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्रीवर पाय ठेवू नये, याकरिता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी शहा यांना गळ घातली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने शहा यांच्या भेटीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत केंद्रात रालोआचे सरकार आहे, याची आठवण शहा यांना करून दिली आहे.
भाजपाला 144 जागा हव्यात, अशी राज्यातील नेत्यांची मागणी आहे. शिवसेनेने अद्याप त्या मागणीवर प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेने ही मागणी मान्य करून काही जागांबाबत चर्चा अडली, तर अंतिम टप्प्यात एखाद-दुस:या जागेच्या देवाणघेवाणीकरिता शहा व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी राज्यातील भाजपा नेत्यांची इच्छा आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शहा यांची भेट घेतली व मुंबई भेटीत मातोश्री भेट टाळू नका, असा सल्ला दिला आहे. केंद्रातील सरकारला बहुमत मिळाले असले तरी सरकार रालोआचे असून मित्रपक्षांचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला राऊत यांनी दिल्याचे समजते.
असा असेल कार्यक्रम
अमित शहा यांचे सकाळी साडेनऊ वाजता मुंबई विमानतळावर जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर ते पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पूनम महाजन यांच्या निवासस्थानी भोजन करणार आहेत. तेथून ते लालबाग-परळमधील गणपतीचे दर्शन घेऊन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी उशिरा लोढा फाऊंडेशनद्वारा आयोजित गणोश महोत्सवास तसेच तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनास भेट देऊन महाआरतीतही सहभागी होतील.
शहा भेटीवरून युतीमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर येण्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी टाळले. फडणवीस हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नागपूर येथे असल्याने हजर राहू शकले नाहीत, असा खुलासा भाजपने केला.
मौका सबको मिलता है
च्लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान असताना मुंबईत आले होते तेव्हा भाजपाच्या एका नेत्याने अडवाणी हे मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे एसएमएस पाठवले होते.
च्लागलीच शिवसेनेने बाळासाहेब आता विश्रंती घेत असल्याने अडवाणी यांना भेटणार नाहीत, असे एसएमएस माध्यमांना पाठवून अडवाणी यांना भेटण्याचे टाळले होते. ही घटना आम्ही विसरलेलो नाही.
च्मौका सबको मिलता है..आता आमची वेळ आली आहे, असे मत एका बडय़ा भाजपा नेत्याने व्यक्त केले. त्याचवेळी संपूर्ण मुंबईत शहा यांच्या स्वागताकरिता लागलेले ‘अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र हे फलक हेही शिवसेना वतरुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.