मुंबई : प्रभागांच्या नव्या फेररचनेमुळे आणि आरक्षणाच्या बदलामुळे हा प्रभाग चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र सूचना व हरकती घेतल्याने या प्रभागात थोडा बदल करण्यात आला. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलतील असा कयास आहे. या प्रभागातील पश्चिम मुंबईत मालाड - जोगेश्वरी येथे न्यायालयांचे संकुल उभारून सर्व न्यायालये एकाच इमारतीत उभारली आहेत. याच धर्तीवर गेल्या २० वर्षांहूनही अधिक या प्रभागातील कुर्ला तहसील कार्यालयासमोरील मैदानात २२ प्रकारची न्यायालये एकत्रित एकाच इमारतीत आणण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर तरी हे प्रकरण मार्गी लागणार का, असा सवाल १०४ प्रभागातील मतदार करीत आहेत. प्रभाग क्रमांक ९९, १०३ आणि १०२ मिळून १०४ हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. १०४च्या उत्तरेकडून ए.सी.सी. सिमेंट रोड, पूर्वेकडे मध्य रेल्वे लाइन, दक्षिणेकडे नाहूर रोड व पश्चिमेकडे नेहरू रोड, एस. एल. रोड व उपाध्याय रोड अंतर्गत सीमा बंदिस्त केलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नव्या १०४ प्रभागाच्या रचनेसाठी पूर्वीचा मुलुंड पूर्वेचा भाग काढण्यात आला आहे. तसेच नाहूर रेल्वे लाइनच्या बाजूने दीनदयाळ रोड ते एसीसी सिमेंट रोडच्या नाक्यापर्यंत (पूर्व - पश्चिम पुलापर्यंत) वाढविलेला आहे. सदर प्रभागात तांबे नगर, इंदिरा नगर, सिद्धार्थ नगर या विभागांचा समावेश आहे. या प्रभागात एकूण ५६ हजार ६३३ मतदार आहेत. यामध्ये मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. तब्बल १९ हजार ६१४ मराठी मतदार या प्रभागात आहेत. गुजराती (१८ हजार ५३५), उत्तर भारतीय (८ हजार ५३६), मुस्लीम (१ हजार ७८०), अन्य (८ हजार १६७) मतदारांचा यात समावेश आहे. सध्या हा प्रभाग खुला ओबीसी झाला आहे. या प्रभागात कुर्ला तहसील कार्यालयात मुलुंड, भांडुप न्यायालये आहेत. गेल्या २० वर्षांपासून येथील तहसील कार्यालयासमोरील मैदानात २२ प्रकारची न्यायालये एकत्रित एकाच इमारतीत आणण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र अद्याप हे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे या इमारतीचे काम या निवडणुकीत तरी पूर्ण होईल का, असा सवाल येथील मतदारांना पडला आहे. मात्र याचे काम अंतिम टप्प्यात असून, हा प्रश्न निकाली लागणार असल्याची माहिती स्थानिक भाजपा आमदारांनी दिली. तसेच या प्रभागातील इंदिरा नगर, विजय गार्डन, वैकुंठभूमीसमोरील जमिनीवर सरकारी आरक्षणे आहेत. (प्रतिनिधी)जात प्रमाणपत्र पडताळून पाहा हं...हा प्रभाग ओबीसी महिला म्हणून खुला असल्याने या प्रभागातील उमेदवाराने जात प्रमाणपत्र आधीच पडताळून पाहावे असा सल्ला येथील मतदारांना देण्याची वेळ येत आहे. मागील निवडणुकीत केवळ भाजपाचा उमेदवार म्हणून भावना जोबनपुत्रा यांना निवडून दिले. मात्र त्यांचा बहुतेक कार्यकाळ हा जातीचे प्रमाणपत्र वैध की अवैध? या प्रकरणातच वाया गेला. त्यामुळे विकासाची कामेच झाली नाहीत. त्यात तीन वर्षांचा कार्यकाळ संपता संपता त्यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे स्पष्ट झाले; आणि त्यांच्याकडून नगरसेवकपद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची वर्णी लागली. मात्र त्यांना विकासकामांसाठी खूपच कमी वेळ मिळाला. अशात या प्रभागाचा हवा तसा विकास झाला नाही. किमान या वर्षी तरी उमेदवाराचे जात प्रमाणपत्राचे सर्व निकष पडताळूनच त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदार करीत आहेत.
२० वर्षे उलटूनही न्यायालयाची इमारत जैसे थे?
By admin | Updated: January 21, 2017 02:59 IST