उल्हासनगर : शहरातील रस्त्याची पुनर्बांधणी व दुरुस्तीवर कोट्यवधी खर्च करूनही पावसाळयात त्यांची चाळण झाली आहे. महापालिका हद्दीतील बहुंताश रस्त्याची दुरस्ती व पुनर्बांधणी लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेला केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन पावसाळयात रत्यांची चाळणी होऊन रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त करून मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते हिराघाट रस्ता, भंगार गल्ली रस्ता, राधास्वामी संत्सग ते सेक्शन रस्ता, भाटिया चौक ते कालिका मंदिर रस्ता, फॉरवर्ड लाइन ते टॉऊन हॉल रस्ता, गणेश नगर रस्ता, टँकर पाणी पॉइंट रस्ता, व्हिनस चौक ते मार्यानगरी रस्ता आदी रस्ते खड्डेमय झाले आहेत़ पालिकेचे क्षेत्रफळ जेमतेम १३ किमी असून शहरातील रस्ता बांधणी व दुरुस्तीवर खासदार निधी, आमदार निधी, महापौर व स्थायी समिती सभापती निधी, नगरसेवक निधी खर्च होत आहे. आदीच्या निधीच्या खर्चानंतरही महापालिका दरवर्षी रस्ता बांधणीवर ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करीत आहे. दरवर्षी कोट्यवधीचा निधी फक्त रस्त्याच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीवर खर्च होऊनही त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील गाऊन मार्केटमधील रस्ता, हिराघाट रस्ता, नेताजी चौक ते व्हिनस चौक रस्ता, काली माता चौक ते गणेश नगर रस्ता एका वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत. एका वर्षात या काँक्रिट रस्त्याची स्थिती डांबरी रस्त्यासारखी झाली आहे. पालिका अशा ठेकेदारावर काहीएक कारवाई करीत नसल्याने पालिकेवर टीका होत आहे. (प्रतिनिधी)
रस्ताबांधणीचे सुमारे ४० कोटी पाण्यात
By admin | Updated: July 21, 2014 03:26 IST