मुंबई : मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या ठिकाणी दळणवळण व मूलभूत सुविधांसाठी १५ हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण केले असून, येत्या काही काळात एमएमआरडीएच्या वतीने ३६ हजार कोटींचे प्रकल्प राबविले जाणार आहेत, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले. एमएमआरडीएने पांजरपोळ-घाटकोपर लिंक रोड व खेरवाडी जंक्शनजवळील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त पांजरपोळजवळ झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध राहिले आहे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्याबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा राबविल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी सुरू केलेले मोनो रेल्वे, मेट्रो-१, सहार उन्नत, अमर जंक्शन, पूर्व मुक्त मार्ग यांसारखे प्रकल्प पूर्ण केले असून, त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी खर्च आला आहे. त्याशिवाय सध्या १० हजार कोटींच्या अन्य प्रकल्पांचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्णत्वास येतील, आगामी काळात मेट्रो-३, वरळी-शिवडी कनेक्टर, मुंबई पोरबंदर प्रकल्प, सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प यांसारखे ३६ हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम हाती घेणार आहोत. (प्रतिनिधी)
मुंबईत ३६ हजार कोटींचे प्रकल्प
By admin | Updated: June 17, 2014 03:28 IST