ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ : शिरुर शहरापासून दिड किलोमीटर अंतरावर घोडेनदीवरील सतराकमानीचा पूल बांधून १४८ वर्षे लोटली आहेत. इंग्रजी सरकारने हा पुल बांधतानाच याचे आयुष्य १५० वर्षे निश्चित केले होते. २०१७ साली या पुलाला १५० वर्षे पुर्ण होतील इंग्रज सरकारने (इंग्लंड) याबाबत सहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्कही साधला आहे. यामुळे आता या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिरुर हे विदर्भ मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते. विदर्भाला जोडण्यासाठी शिरूर अहमदनगर सीमेवर १८६६ साली इंग्रजांनी घोड नदीवर सतरा कमानीच्या कामाची सुरुवात केली. २४० मीटर लांबीच्या १०-४० मीटर रुंदी तर ११ मीटर उंचीच्या या पुलाचे काम त्यावेळी केवळ एका वर्षात पुर्ण करण्यात आले. १८६७ साली हा पुल वापरण्यासाठी खुला करण्यात आला. त्यावेळी या पुलाला केवळ १ लाख ४ हजार रुपये खर्च आला. या पुलाला १२-२० मीटर लांबीचे असे १७ गाळे बांधण्यात आले असल्याने या पुलास १७ कमानीचा पुल म्हणून संबोधले जाते. प्रत्येक कमानीची जाडी ७० सेंटिमीटर एवढी आहे.
हा पूल दगडी होता. सतराकमानी पुल देखील दगडी आहे. नूतनीकरणाचे काम झाले असले तरी त्याचा फार फायदा होईल, याबाबत शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे सूतोवाच केले आहे. यात या पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट होईल. इंग्रज देशातून जाऊन ६९ वर्षे लोटली, ते आपल्या देशी परतले. मात्र काम करण्याची त्यांची पद्धत अजूनही आदर्शवत अशी आहे.