हाळी हंडरगुळी : सततच्या जोरदार पावसामुळे उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील तिरू मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे हाळी हंडरगुळीसह परिसरातील गावांच्या पाणीप्रश्नाबरोबर सिंचनाचाही प्रश्न संपुष्टात आला आहे. प्रकल्प पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पिकांपुरता पाऊस झाला होता. त्यामुळे पिकेही बहरली होती. मात्र, पिण्याच्या पाण्याची भीती व्यक्त होत हाेती. त्यातच जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने ताण दिला. परिणामी, बहरलेली पिके कोमेजून जात होती. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी पीक जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दरम्यान, वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला आणि पिकांना जीवदान मिळाले. मात्र, प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज होती.
गत आठवड्यापासून सतत संततधार पाऊस झाला. याशिवाय, मागील दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. गेल्या आठवड्यापर्यंत तिरू मध्यम प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर महिना सुरू झाला असतानाही प्रकल्प भरला नसल्याने आगामी काळात पाणीटंचाईची भीती जाणवत होती. मात्र, दोन दिवसांत झालेल्या पावसाने तिरू प्रकल्प पूर्णपणे भरला.
तिरू नदीचे पात्र हे उदगीर, चाकूर व जळकोट या तीन तालुक्यात विस्तारले आहे. या नदीवरच हाळी गावाजवळ असलेल्या चिमाचीवाडी येथे १९७६ साली तिरू मध्यम प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३.३२ दलघमी एवढी आहे. २०११ साली तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पुढाकाराने प्रकल्पाची उंची एका मीटरने वाढविल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र २६९.६७ चौ.किमी एवढे आहे. त्यामुळे २६५४.६० हेक्टर जमिनीला त्याचा लाभ होतो. प्रकल्पाअंतर्गत २६२५.०२ हेक्टर जमीन वहिताखाली येते. त्याचा फायदा हाळी हंडरगुळीसह चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, वाढवणा बु., वाढवणा खु., लांबी, बेळसांगवी आदी गावांतील शेतकऱ्यांना होतो. शिवाय, पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प आधार आहे. या प्रकल्पावरून ५२ खेडी पाणीयोजना कार्यान्वित आहे.
चार दरवाजे उघडले होते...
मंगळवारी सायंकाळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने रात्री चार दरवाजे उघडले होते. पण पाऊस थांबल्याने बुधवारी एकच दरवाजा उघडला गेला, असे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.
दोन वर्षांनंतर तिरू मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे, असे चिमाचीवाडीचे सरपंच नाथराव बंडे यांनी सांगितले.