लातूर : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, बारावीचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळाने दहावीचे ३०, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के असे निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागली आहे. दहावी, अकरावी आणि बारावी असे तिन्ही मिळून सरासरी गुण बारावीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे बारावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील बारावीचे सीबीएसई विद्यार्थी - मुले - २५० मुली - २२०
जिल्ह्यातील बारावीचे स्टेट बोर्ड विद्यार्थी - मुले - १७,२०० मुली - १६,१००
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार...
दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर अकरावीला नियमित कॉलेज केले. बारावीचे वर्ग कोरोनामुळे ऑनलाइन झाले. त्यात परीक्षा झालीच नाही. त्यामुळे दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित गुणाचे सूत्र निकालावर परिणाम करणारे ठरते की काय असा प्रश्न आहे. निकाल लागणार असल्याने चिंता आहे. मात्र, चांगली टक्केवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. - प्रणव बिडवे, विद्यार्थी
बारावीचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्याने दहावी, अकरावी, बारावीचे एकत्रित मूल्यमापन केले जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे अभ्यास सुरूच असून, निकाल काय लागतो याची प्रतीक्षा लागलेली आहे. - गणेश पाटील, विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा...
बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिलेले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे मिळून निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत चिंता न बाळगता पुढील अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या परीक्षांची तयारी करावी. नीट, जेईई, सीईटी याकडे लक्ष दिल्यास पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे सुकर होईल. - श्रीनिवास पाटील, प्राचार्य
बारावीचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांवर आधारित आहे. महाविद्यालयांच्या वतीनेही निकालाची कामे अंतिम टप्यात आहेत. विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करावी. कारण नीट, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र परीक्षा होत असते. त्यामुळे बारावीच्या निकालाची चिंता करण्यापेक्षा पुढील अभ्यासक्रमासाठी गरजेच्या असलेल्या परीक्षांवर फोकस करावा. - गाेविंद शिंदे, प्राचार्य