लातूर : ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी तातडीने पावले उचलून हक्काचे आरक्षण सन्मानाने परत द्यावे. जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नयेत. त्याचबरोबर अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल, अशी ग्वाही राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला असून ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका नकोत, अशी भूमिका घेत भाजपाच्यावतीने बुधवारी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे याकरीता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणतीही ठोस भूमिका किंवा त्या अनुषंगाने पावलेही उचललेली नाहीत. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही. न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. राज्य सरकारच्या या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला असून या निवडणुका होणार नाहीत यासाठी प्रयत्न करून राज्य सरकारने तत्काळ ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संजय दोरवे, बापूराव राठोड, शैलेश गोजमगुंडे, विक्रम शिंदे, तात्याराव बेद्रे, विजय क्षीरसागर, दिलीप धोत्रे, प्रेरणा होनराव, ज्ञानेश्वर चेवले, देवा गडदे, शिरीष कुलकर्णी, शिवसिंह सिसोदिया, दिग्विजय काथवटे, गोरोबा गाडेकर, भागवत सोट, प्रशांत पाटील, हणमंत नागटिळक, चंद्रसेन लोंढे, बन्सी भिसे, उषा रोडगे, गणेश गोमचाळे, विपुल गोजमगुंडे, आदिनाथ मुळे, धनराज शिंदे, प्रवीण सावंत, सतीश बिराजदार, काशीनाथ ढगे, भैरवनाथ पिसाळ, विनायक मगर, अमोल गिते, महादेव कानगुले, ज्योतिराम चिवडे, अमोल गिते, संतोष तिवारी आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.