चाकूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्राचा वापर वाढला आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून किसान ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिला जाणारा हवामानाचा अंदाज, पीक परिस्थिती, मार्गदर्शन आणि कृषी सल्ला बंद करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून ही माहिती दिली जात होती. यामुळे शेतक-यांची गैरसोय होत आहे.
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच पीक पेरणीपासून ते थेट काढणीपर्यंतचे सखोल मार्गदर्शन, रोगराई नियंत्रण फवारणी यासंबंधी किसान ॲपच्या माध्यमातून मोबाईलवरुन मार्गदर्शन करण्यात येत होते. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व लातूर येथील मांजरा कृषी विकास केंद्राच्या वतीने कृषी सलंग्न माहिती देण्यात येत होती. यावर्षी जून महिन्यात किसान ॲपच्या वतीने हवामानाचे अंदाज उशीराने देण्यात आले. जूलै महिन्यापासून किसान ॲपवरुन देण्यात येणारे अंदाज बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पिकांवर पडलेल्या विविध रोगावर काय उपाययोजना करावी. हे यंदा शेतकरी बांधवांना समजून आले नाही. कृषीधारकांनी गळ्यात महागडी किटकनाषके घातली. ती फवारावी लागली.भारत कृषी प्रधान देश आहे.जय जवान जयकिसान चा नारा दिला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी बांधवांना पूर्वी दिल्या जाणा-या माहितीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे शेतक-यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
किसान ॲपच्या माध्यमातून हवामान, पाऊस पाणी, पीक परिस्थिती, पिकांवरील रोगराई, उपाययोजना पीक पेरणी मार्गदर्शन दहा वर्षांपासून मिळत होते. आता बंद करण्यात आले आहे. शासनाने यात लक्ष घालून ही सर्व माहिती पूर्ववत देण्यास सुरुवात करावी. - नागनाथ पाटील, शेतकरी
किसान ॲपच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती पुन्हा सुरु करण्यात यावी. यासाठी कृषी विद्यापीठ परभणी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - डी.एस. गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी लातूर